ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मंदिरात प्रवेश देण्याच्या कारणावरुन आळंदीत पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. माऊलींच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी वारकरी आग्रह धरत होते. मात्र, प्रवेशाला मर्यादा असल्याने पोलिसांनी वारकऱ्यांना परवानगी नाकारली. त्यावेळी पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट झाली. त्यामुळे या वारीला पालखीच्या प्रस्थानादिवशीच गालबोट लागले.
आज माउलींच्या पालखी सोहळय़ाचे मुख्य मंदिरातून पंढपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थान सोहळय़ा दरम्यान मंदिरातील गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी यंदा कडक बंदोबस्त आणि नियमावली केली असून पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नाही. मानाच्या दिंडय़ांमध्ये देखील मोजकेच 75 वारकरी मोजून सोडले जात आहेत. अशातच पास आणि संख्येवर काही वारकऱ्यांनी आक्षेप घेत नियम झुगारण्याच्या प्रयत्न करत महाद्वार गाठण्याचा प्रयत्न केला. यावेळी वारकरी आणि पोलिसात काही वेळ शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वारकऱ्यांनी पोलीस बंदोबस्तातील कर्मचारी आणि बॅरिकेट्स ढकलून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी पुन्हा पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. पण वारकरीही चांगलेच संतापले होते. अशात पोलिसांनी काही वारकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.