संभाजी भिडे हे शिवाजी महाराजांच्यावर हल्ला करणाऱ्या अफजल खानाच्या वकिलांचे वंशज असल्याचा मोठा दावा कॉंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे. एका खाजगी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपली संतप्त प्रतिक्रीया देताना त्यांनी हा दावा केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे पुन्हा चर्चेत आहेत. त्यांच्या या विधानानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाल्यावर पावसाळी विधीमंडळातही त्याचे पडसाद उमटले आहेत. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी करून राज्यभर आंदोलन उभा करण्याचा इशारा दिला आहे.
आपल्या मुलाखतीमध्ये बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, “हा माणूस इतका घाणेरडा आहे कि संभाजी भिडे ज्या भागातून येतात तेथे फोन लावला आणि हा कसा माणूस आहे असं विचारलं. तेव्हा स्थानिक लोकांनी सांगितलं की, संभाजी भिडे अफजल खानाचे वकिल कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचे वंशज आहेत. म्हणजे हे वंशज कोणाचे…नाव काय ठेवतात…बोलतात काय….दुसरीकडे त्यांना पाठींबा देणारे सरकार त्यांना खुलेपणाने फिरू देत आहे.”
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “आम्ही संभाजी भिडेंवर गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरल्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. संभाजी भिडेंवर सगळीकडे अदखलपात्र गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे. देशाच्या इतिहासाची मोडतोड करण्याचा अधिकार कोणालाही नसून हे असंच करत राहिले आणि समाजात अशांतता पसरेल. १५ ऑगस्टच्या काळात जर काही अनर्थ झाला, तर याला जबाबदार गृहखातं, पोलीस आणि नालायक संभाजी भिडे असेल,” अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी सरकारला इशारा दिला.