प्रतिनिधी/तांबवे / कराड
कराड तालुक्यातील मुंढे गावचे सुपूत्र संदीप रघुनाथ सावंत (वय 30) हे जम्मू-काश्मिरच्या नौशेरा सेक्टरमध्ये मंगळवारी सायंकाळी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले. सप्टेंबर 2011 मध्ये सैन्यदलात भरती झालेले संदीप हुतात्मा झाल्याचे वृत्त येताच मुंढे गावासह कराड तालुक्यावर शोककळा पसरली. हुतात्मा संदीप यांचे पार्थिव विमानाने कराडला आणण्याच्या हालचाली सैन्यदलाकडून सुरू झाल्या आहेत. दरम्यान, संदीप यांचा थोरला भाऊ शशिकांत यांच्याशिवाय कुटुंबातील इतरांना याबाबतही माहिती कळू दिलेली नाही.
संदीप यांचा जन्म मुंढे येथे 11 ऑक्टोबर 1990 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विजयनगर (ता. कराड) येथील प्रेमलाकाकी चव्हाण विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण कराडच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात झाले होते. तीन वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना तीन महिन्यांची मुलगी आहे. मुलीच्या बारशासाठी पाच दिवसांची सुट्टी घेऊन पंधरा दिवसांपूर्वी ते गावी आले होते. मुलीचा नामकरण सोहळा झाल्यावर ते पुन्हा सेवेत रुजू झाले.
मंगळवारी सायंकाळी जम्मू-काश्मीर येथील राजौरी जिह्यात अतिरेक्यांनी एलओसीवर घुसखोरी केली. अतिरेक्यांना घेरा घालत भारतीय सैन्याने सर्च ऑपरेशन सुरू केले. ऑपरेशन सुरू असताना लान्सनायक संदीप सावंत आणि रायफलमॅन अर्जुन थापा हे अतिरेक्यांच्या गोळीबारात जखमी झाले. तरीही त्यांनी अतिरेक्यांच्या गोळीबाराला धाडसाने प्रत्युत्तर दिले. अतिरेक्यांनी गोळीबार सुरुच ठेवला. गोळीबारात संदीप सावंत आणि अर्जुन थापा शहीद झाले. संदीप शहीद झाल्याचे वृत्त कळताच मुंढे ग्रामस्थ आणि संदीपच्या मित्रांना धक्का बसला आहे. ‘संदीप मनमिळाऊ स्वभावाचा होता’ अशी आठवण त्याच्या मित्रांनी सांगितली. त्यांच्या पश्चात वडील रघुनाथ सावंत, आई अनुसया, भाऊ शशिकांत, पत्नी स्मिता आणि मुलगी रिया असा परिवार आहे.
दरम्यान, संदीप यांचे पार्थिव गावी कधी येईल, याबाबतही अधिकृत माहिती अद्याप प्रशासनालाही देण्यात आलेली नाही. सातारा जिल्हा सैनिक कल्याण बोर्डालाही फक्त संदीप सावंत हे हुतात्मा झाल्याचे कळविण्यात आले आहे. इतर कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंढे ग्रामस्थ संदीप यांच्या पार्थिवाच्या प्रतीक्षेत आहेत. संदीप यांच्या निधनामुळे गावावर शोककळा असली, तरी गावचा सुपुत्र अतिरेक्यांशी लढताना हुतात्मा झाला, याचा अभिमानदेखील ग्रामस्थ आणि युवकांना आहे. मंगळवारी सकाळपासून ग्रामस्थ संदीप यांच्या घरामागील मोकळ्या जागेची स्वच्छता करत आहेत. त्या ठिकाणी संपूर्ण मुंढे, विमानतळ परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. परंतु आपला मुलगा हुतात्मा झालाय, याची संदीप यांच्या कुटुंबीयांना अद्याप कल्पना नाही.
संदीपच्या आठवणीने मित्र सुन्न
संदीप नुकताच गावी आल्याने त्याची मित्रांशी भेट झाली होती. मित्रांशी गप्पा मारताना संदीपने सैन्यदलातील अनेक किस्से सांगितले होते. नुकताच भेटून गेलेला संदीप हुतात्मा झाल्याचे वृत्त आल्याने मित्रांना हुंदका आवरता येत नव्हता. अतिरेक्यांच्या कारवाया आणि पाकिस्तानच्या घुसखोरांविषयी संतप्त भावना व्यक्त होत होत्या.