प्रतिनिधी / उस्मानाबाद
93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बेळगाव सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना धमकी देणाऱया कर्नाटक नवनिर्माण सेनेचा आणि मराठी साहित्य संमेलनावर बंदी घालणाऱया कर्नाटक सरकारच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाचा कार्यक्रम उस्मानाबाद येथे झाला. या संमेलनाच्या समारोपाच्या व खुल्या अधिवेशनात एकूण वीस ठराव मांडण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशात मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना धमकी देणाऱया कर्नाटक नवनिर्माण सेनेचा निषेध करणारा ठराव मांडण्यात आला. यासाठी प्रकाश पायगुडे हे सूचक होते, तर रमेश वसकर यांनी अनुमोदन दिले.
याशिवाय सीमावासीय मराठी भाषेचे रक्षक आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती जपत आहेत. सीमा भागात संमेलनं घेऊन ते माय मराठीचा जागर करीत आहेत. परंतु शनिवारी कर्नाटक सरकारने सीमा भागात मराठी साहित्य संमेलन भरवण्यास बंदी घातली. मराठी भाषेवर, संस्कृतीवर कर्नाटक सरकारने दडपशाहीचा घाला घालत असल्याचा आरोप करीत कर्नाटक सरकारचा निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावासाठी डॉ. दादा गोरे हे सूचक होते, तर रवींद्र केसकर यांनी ठरावास अनुमोदन दिले.
संमेलनात झालेले महत्त्वपूर्ण ठराव
शेतकऱयांच्या शेतीमालाला हमीभाव मिळवून देणे.
बारावीपर्यंत मराठीच्या शिक्षणाचा कायदा, मराठी भाषा भवन, मराठी विद्यापीठ आणि प्राधिकरण अशा मागण्यांची पूर्तता सरकारने त्वरित करावी.
मराठी शाळा बंद होणार नाहीत, यासाठी कृती योजना आखावी.
घटनेतील तरतुदीप्रमाणे विविध क्षेत्रातील तज्ञांच्या विधान परिषदेवर नियुक्त्या कराव्यात.
परराज्यातील मराठी भाषिकांसाठी बृहन महाराष्ट्र मराठी भाषा विभाग असा स्वतंत्र विभाग उघडावा. तसेच मराठी भाषेसाठी अंदाजपत्रकात भरघोस तरतूद करावी.
अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर गदा आणणाऱया झुंडशाही प्रवृत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा.
परराज्यात असणारे महाराष्ट्र परिचय केंद्राचे पुनरुज्जीवन करावे.
राज्यातील बोलीभाषांच्या संवर्धनासाठी तज्ञांची समिती नेमावी.
मराठवाडय़ाला दुष्काळमुक्त करण्यासाठी हक्काची 23 टीएमसी पाणी मिळावे.
उस्मानाबादेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे
उस्मानाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर करावे.
उस्मानाबादच्या विकासासाठी बिदर ते टेंभुर्णी महामार्ग आणि सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्ग लवकरात लवकर काम सुरू करून पूर्ण करावा.