प्रतिनिधी / सोलापूर
पती तसेच सासू-सासऱयाकडून पैशाच्या मागणीसाठी सतत होणाऱया त्रासाला कंटाळून दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर शिवारातील विहिरीत सहा महिन्याच्या बाळासह उडी घेऊन मातेने आत्महत्त्या केल्याप्रकरणी पतीला पाच वर्षे सक्तमजुरी 2 हजार दंड तर सासू-सासरे यांना प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी 1 हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश जगताप यांनी गुरुवारी सुनावली.
या खटल्याची माहिती अशी की, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे गावातील करीना यांचा विवाह सन 2016 मध्ये हत्तूर शिवारात राहणारा आरोपी पती रियाज अब्दुल मेहबूब शेख उर्फ मंद्रुपकर याच्याशी झाला होता. त्यानंतर त्यांना मुलगा झाला. मुलगा अबुजैद हा साधारण सहा महिन्याचा होता. त्यावेळी सासरा अब्दुल, सासू बानुमा सत्तार शेख व पती रियाज हे पैशासाठी करीना यांना त्रास देत होते. यामुळे करीना यांनी पती रियाज यास मोटरसायकल घेण्यासाठी माहेरुन 10 हजार रुपये घेऊन दिले. परंतु, आरोपीने त्या पैशातून मोटरसायकल घेतली नाही, उलट पुन्हा मोटरसायकल घेण्यासाठी 20 हजारांची मागणी करुन नेहमी शिवीगाळ व मारहाण करत होता. पतीसह सासू व सासऱयांकडून पैशासाठी होणाऱया त्रासाला कंटाळून करीना यांनी सहा महिन्याच्या मुलासह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी करीना यांचे वडील सैफन शेख यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला होता. या गुह्याचा तपास करुन तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र उशिरे यांनी करुन आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारतर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले.
सरकारतर्फे न्यायालयात उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले, तसेच केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी रियाज यास पाच वर्षे सक्तमजुरी व 2 हजार दंड तर आरोपी अब्दुल व बानुमा यांना प्रत्येकी एक वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 500 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकारतर्फे ऍड. प्रेमलता व्यास, मूळ फिर्यादीतर्फे ऍड. अनघा कुलकर्णी तर आरोपीतर्फे ऍड. मचाले यांनी काम पाहिले. त्याचबरोबर कोर्ट पैरवी म्हणून कासे व कोकणे यांनी मदत केली.