कोल्हापूर/प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील पाडळीपैकी मानेवाडी येथे 37 जणांना अन्नातून विषबाधा झाली. गावातील अवधुत पाटील यांचे आजोबा मयत झाले आहेत. त्यांच्या रक्षाविसर्जनानंतर भाऊबंद व नातेवाईकांच्या घरातून आलेले जेवण एकत्र करून खाल्ल्यानंतर हा प्रकार घडला. विषबाधा झालेल्या सर्वांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असून, वडगांव पोलीसांत या घटनेची नोंद झाली आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, गावातील दत्ताञय पाटील यांचे काही दिवसांपुर्वी निधन झाले आहे. त्याच्या रक्षाविसर्जन कार्यक्रमानंतर भाऊबंद व नातेवाईकांच्या घरातून आलेले जेवण एकञित करून सर्वजण जेवण्याची प्रथा आहे. पाटील यांच्या घरी सुमारे साठजणानी बुधवारी राञी हे जेवण केले. त्या सर्वांना अन्न विषबाधा होवून गुरूवारी पहाटेपासूनच पोटदुखी व उलट्यांचा ञास सुरू झाला. त्यामुळे त्यांना नवे पारगाव येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एम.जी. जमादार, बी. एस. लाटवडेकर, ज्योती कांबळे, अनिता शहा यांच्यासह अन्य कर्मचार्यांनी संबंधीतांवर तत्काळ उपचार सुरू करून परिस्थीती नियंत्रणात आणली. ही घटना समजताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, हातकणंगले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, शैलेश गायकवाड, जेसिका,शिखरे, एस.बी.पाटील यांनी रूग्णांची विचारपूस करून पुढील उपचारांबाबत सुचना केल्या. या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.