अजूनही बरेच क्रिकेट बाकी, विश्वचषक खेळण्यासाठी सक्षम असल्याचा दावा, 2015 नंतर संघाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर
नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघातून 2015 मध्येच बाहेर पडलेल्या रॉबिन उत्थप्पाला अद्याप आंतरराष्ट्रीय पुनरागमनाचे वेध कायम आहेत. भारतीय संघाला उत्तम फिनिशरची गरज असून ती जागा मी सक्षमपणे भरु शकतो, असे प्रतिपादन त्याने केले. ‘मला आणखी एक वर्ल्डकप निश्चितपणाने खेळायचा आहे’, असे तो याप्रसंगी म्हणाला.
कर्नाटकचा धडाकेबाज फलंदाज असणारा उत्थप्पा 2007 वनडे विश्वचषक संघात होता तसेच उद्घाटनाच्या 2007 टी-20 विश्वचषक संघाचाही तो सदस्य राहिला. जुलै 2015 मध्ये केलेला झिम्बाब्वे दौरा त्याच्यासाठी शेवटचा ठरला. त्यानंतर त्याला भारतीय संघात एकदाही स्थान मिळालेले नाही. 34 वर्षीय उत्थप्पाला ऑक्टोबर 2011 पासून केवळ 8 वनडे व 4 टी-20 सामने खेळण्याची संधी लाभली.
माझे आव्हान स्वतःलाच
‘सध्याच्या घडीला मी स्वतःला आव्हान देतो आहे. माझ्यात अद्याप बरेच क्रिकेट दडलेले आहे आणि संधी मिळाल्यास माझ्या शैलीला अनुरुप जोरदार फटकेबाजी करु शकतो. मी एखादा विश्वचषक सहज गाजवू शकतो, असे मनापासून वाटते. विशेषतः मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मी उत्तम वर्चस्व गाजवू शकेन’, असे उत्थप्पा पुढे म्हणाला.
अर्थात, पुन्हा संघात स्थान लाभण्यासाठी सुदैवाची साथ लाभणे आवश्यक आहे, याचाही तो उल्लेख करतो. ‘मी आशाअपेक्षा अजिबात सोडलेल्या नाहीत. जोवर विश्वचषक खेळण्याची स्वप्नपूर्ती होत नाही, तोवर मी निवृत्तीचा विचारही करणार नाही’, असे उत्थप्पाने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
न्यूनगंड पाळू नये
‘माझ्या मते, आपण स्वतःला कधीही, कोणत्याही वळणावर अजिबात कमी लेखू नये, तसेच कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड पाळू नये. विशेषतः ज्यावेळी आपल्यात क्षमता आहे, हे स्पष्टपणे ज्ञात असते, अशा वेळी तर आपण अजिबात मागे राहू नये. सर्व बाबी माझ्या मनाप्रमाणे होतील आणि मी विश्वचषक जिंकणाऱया संघाचा भविष्यात एक सदस्य असेन, यावर माझा विश्वास आहे. हे माझे स्वप्न आहे आणि ते आहे तोवर मी क्रिकेट खेळणे थांबवणार नाही’, याचा त्याने येथे उल्लेख केला.
एरवी, उत्थप्पाला आघाडी लाईनअपमध्ये फलंदाजी करणे विशेष पसंत असते. पण, आताच्या घडीला भारतीय संघासाठी फिनिशर म्हणून जबाबदारी पार पाडण्याची त्याची इच्छा आहे. सध्या त्याने या दृष्टीने आपल्या होम ग्राऊंडवर सरावही सुरु केला आहे.
‘भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या दिशेने मी तयारीला यापूर्वीच सुरुवात केली आहे. तयारीत कुठेही कसर पडता कामा नये, यावर माझे लक्ष केंद्रित आहे. सलामीला फलंदाजीला उतरणे, हे मी केव्हाही करु शकतो. पण, मधल्या षटकात फलंदाजीसाठी वेगळी तयारी करावी लागते, वेगळी मानसिकता असावी लागते, त्यावर माझा सध्या भर आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघाला उत्तम फिनिशरची नितांत गरज आहे आणि ती उणीव भरुन काढण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असेल’, असे उत्थप्पा शेवटी म्हणाला.