ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाविरोधातील लढाईसाठी आशियाई विकास बँकेने भारताला 2.2 अब्ज डॉलर्सची म्हणजेच 16 हजार 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. बँकेचे अध्यक्ष मसासूगु असकावा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
बँकेचे अध्यक्ष असकावा म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली. संकटकाळात देशातील गरीब जनता, असंघटित कामगार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांवर होणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी बँकेने 2.2 अब्ज डॉलर्सचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. गरज पडल्यास बँकेकडून भारताला आणखी मदत देण्यात येईल. आपत्कालीन काळात भारताला मदत करण्यासाठी आशियाई विकास बँक कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कोरोनाविरोधातील लढ्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा, संसर्ग झालेल्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि इतर आरोग्यविषयक उपकरणांच्या खरेदीसाठी भारताला हा निधी वापरता येणार आहे. यापूर्वी वर्ल्ड बँकेनेही भारताला 7 हजार 500 कोटींची मदत दिली आहे.