आरोग्य मंत्रालयाची माहिती, आता 6.2 दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट , पूर्वी तीन दिवसांनी होत होती दुप्पट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात लॉकडाऊन (टाळेबंदी) सुरू असल्याने कोरोना फैलावाचा वेग मंदावला आहे. पूर्वी देशभरात दर तीन दिवसांनी कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत होती. आता 6.2 दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी चारपर्यंतच्या 24 तासांमध्ये 1 हजार 7 नवे रुग्ण आढळले. तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने 437 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या 13 हजार 893 झाली असून, 1749 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
देशातील 27 राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशात कोरोना संसर्गाचा फैलाव झाला आहे. केरळ, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, चंदीगड, लडाख, पुद्दुचेरी, दिल्ली, बिहार, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम आणि त्रिपुरामध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. आतापर्यंत 5 लाख रॅपिड टेस्ट साधनांचे वाटप झाले आहे. नवीन टेस्ट साधनांमध्ये 30 मिनिटांमध्ये अहवाल मिळणार आहे. तसेच 80 टक्के रुग्ण पूर्ण बरे होत आहेत. कोरोना रुग्ण सापडण्याच्या प्रकरणात 40 टक्के घट झाली आहे, असेही अग्रवाल यांनी नमूद केले. भारताची कोरोनासंदर्भातील स्थिती अन्य देशांपेक्षा चांगली आहे. आता लस तयार करणचे आमचे लक्ष्य आहे. तसेच पारंपरिक औषधांवरही संशोधन सुरू आहे. औषधासंदर्भात विज्ञान व तंत्रज्ञान संस्थांबरोबर चर्चा झाली आहे. या संस्थांचीही औषधनिर्मितीसाठी मदत घेतली जाणार आहे. त्याचबरोबर अनेक संस्थांनी कोरोनावरील लस तयार करण्यासाठी संशोधन सुरू केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पीपीई किट आणि व्हेंटिलेटरचे स्वदेशी डिझाईन तयार केले जात आहे. पुढील महिन्यापर्यंत स्वदेशी रॅपिड टेस्ट किट तयार करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशभरात 3 लाख 19 हजार 400 चाचण्या
देशात आतापर्यंत 3 लाख 19 हजार 400 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. गुरुवारी एका दिवसात 28 हजार 340 चाचण्या घेण्यात आल्या, अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचे (आयसीएमआर) डॉ. रमन गंगाखेडकर यांनी दिली. सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणू संसर्गाविरोधात लढा देत आहे. अशावेळी किरकोळ आजारासाठी हॉस्पिटलमध्ये जाणे टाळावे, असा सल्लाही त्यांनी दिली.