ऑनलाईन टीम / मुंबई
राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांना राज्य सरकार अंशत: परवानगी देणार आहे. सोमवार, दि. २० एप्रिलपासून जिल्हांतर्गत उद्योग सुरू करण्यास माफक परवानगी असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
गेल्या महिन्यात २० तारखेला सगळं ठप्प झालं होतं. मात्र, अर्थचक्र फिरलंच पाहिजे. त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पा मोरया म्हणावंच लागेल. आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन झोन तयार केले आहेत. त्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये माफक प्रमाणात उद्योग, व्यवसाय सुरू करता येतील. जिल्ह्यातल्या जिल्ह्यात मालाची ने-आण करता येईल. परंतु, कुणालाही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही. जिल्हाबंदी कायम राहील, असे ठाकरे यांनी सांगितले.
ग्रीन व ऑरेंज झोनमधील जिल्ह्यातील उद्योगांना राज्य सरकार परवानगी देणार आहे. यासाठी आवश्यक कच्चा मालाची जबाबदारी सरकार घेईल. मात्र, कामगारांची सोय मालकांनाच करावी लागेल. कोणत्याही मजुरांना प्रवास करावा लागणार नाही, याची काळजीही मालकांनाच घ्यावी लागेल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.