भारतातील उपाययोजनांनी प्रभावित होऊन कडक निर्बंध
प्रारंभी आवश्यक खबरदारी अभावी कोरोनाचा झपाटय़ाने प्रादुर्भाव
विमानसेवा, शाळा-महाविद्यालये बंद करण्यास उशीर
ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त : मृत्यूही जास्त
थेट लंडनहून सांगतायेत हुमरमळा-वालावलचे प्रशांत देसाई
प्रमोद ठाकुर / कुडाळ:
लंडन (युके) मध्ये विमानसेवा तसेच शाळा-कॉलेज बंद करण्यास उशीर केल्याने तसेच इटली, युरोपमधून मोठय़ा प्रमाणावर आलेल्या लोकांमुळे आणि त्यासाठी तात्काळ आवश्यक ती घ्यावी लागणारी खबरदारी सरकारने घेतली नसल्याने कोरोना विषाणूचा प्रसार झपाटय़ाने झाला. लंडनमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त असल्याने मृत्यूचे प्रमाणही खूप वाढले. मात्र, आता भारताने लॉकडाऊन व इतर प्रकारच्या केलेल्या उपाययोजनांनी प्रभावित होऊन लंडनमध्ये उशिरा का होईना कडक निर्बंध घातले जात असल्याने कोरोना आटोक्यात येत आहे, असे मूळ कुडाळ तालुक्यातील हुमरमळा-बांधकोंड (वालावल) येथील रहिवासी व लंडनमधील कॅपजेमिनी कंपनीत मॅनेजर पदावर व ब्रिटीश गॅस कंपनीत सपोर्टलीड म्हणून कार्यरत असलेले प्रशांत शशिकांत देसाई यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
देसाई साडेतीन वर्षांपूर्वी लंडनमध्ये नोकरीनिमित्त गेले. सध्या ते तसेच त्यांची पत्नी सौ. प्रणाली देसाई (पूर्वाश्रमीची प्रणाली प्रभाकर प्रभू, मातोंड-तळवडे) व मुलगा प्रणील असे तिघे राहतात. लंडनमधील महत्वाच्या हिर्थो एअरपोर्टपासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर थेम्स नदीच्या काठीवर वसलेल्या ‘स्टेन्स’ या टुमदार गावात ते राहतात.
सुरुवातीला गांभीर्याने घेतले नाही
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लंडनमध्ये झाल्यावर त्याबाबत तेथील जनता व सरकारने फारसे गांभीर्याने घेतले नाही. लंडनमध्ये मोठय़ा प्रमाणावर बाहेरील देशातील नागरिक आले. त्यांच्यावरही नियंत्रण ठेवण्यात आले नाही. काही देश वगळता लंडनने आपली विमानसेवा बंद केली नाही. ज्या देशात कोरोनाची लागण झाली. तेथील प्रवासी लंडनमध्ये येत गेले. मात्र, त्यांच्याबाबत खबरदारी घेण्यात आली नाही. अशातच शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यास उशीर झाला.
ज्येष्ठांची संख्या खूप
लंडनमध्ये साठ वर्षांवरील नागरिकांची संख्या मोठी आहे. नव्वद वर्षांवरीलही नागरिक आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर आतापर्यंत ज्येष्ठांना याची बाधा मोठी झाली. प्रतिकारशक्ती कमी असल्याने ज्येष्ठांचे मृत्यू मोठय़ा प्रमाणावर झाले, असे देसाई म्हणाले.
दहा हजारांहून अधिक मृतांची संख्या
कोरोनाचा प्रादुर्भाव लंडनमध्ये जलद झाला. सत्तर वर्षावरील लोकांना लागण झाली. आतापर्यंत सुमारे 84 हजार 562 लोकांना लागण झाली. 10 हजार 612 लोकांचा मृत्यू झाला. दर दिवसाला सहाशे ते सातशे लोकांचा मृत्यू होत असल्याने लंडनमध्ये भीतीचे वातावरण आहे. मृतांमध्ये वयस्करांचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
एका परिवारापेक्षा जास्त लोकांनी मिसळायचे नाही
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने निर्बंध घातले आहेत. एका परिवारापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन मिसळायचे नाही. मॉलचे चालक येणाऱयांना मास्क व हँडग्लोव्हज देत आहेत. मात्र, मास्कची सक्ती करण्यात आलेली नाही. असे असले तरी सहा ते सात फूट अंतर ठेवून फिरायचे आहे. उभे राहायची सक्ती मात्र करण्यात येत आहे.
जीवनावश्यक दुकाने सुरू
लंडनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, हॉटेल्स सुरू आहेत. मात्र, हॉटेलमधून पार्सल नेणे सक्तीचे आहे. ज्वेलरी, कपडे, घडय़ाळ दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली.
सुरुवातीला जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर काही लोकांनी आपापल्या घरात सामानाचा मोठा साठा करून ठेवल्याने काही दिवस जीवनावश्यक वस्तू, सॅनिटायझरचा तुटवडा भासला. मात्र, त्यानंतर सरकारने खरेदी करण्यावर मर्यादा आणल्या. आता मात्र तुटवडा नसल्याचे ते म्हणाले, सॅनिटायझेशन फवारणी वगैरे लंडनमध्ये केली जात नाही.
पन्नासच्या वरील लोकांनी घरीच बसायचे
ज्येष्ठांना याचा प्रादुर्भाव लवकर होत असल्याने पन्नास ते पंचावन्न वयोगटावरील लोकांनी घरीच थांबायचे आहे. तशी सक्ती आहे. बरे नसल्यास ‘111’ वा रुग्णवाहिकेला दूरध्वनी करून बोलावायचे. ते येऊन घरीच तपासणी करतात. तुमची प्रकृती खूपच बिघडली असेल, तरच रुग्णालयात नेले जाते. अन्यथा तुम्हाला घरीच उपचार करण्याचा सल्ला दिला जातो, असे देसाई यांनी सांगितले. या परिस्थितीला बळी पडणारे जे आहेत. त्यांना आम्हाला पहिली मदत करायला द्या, असे सांगितले जाते आहे.
भारतापासून घेतले धडे
लंडनमध्ये मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. त्याच दरम्यान भारताने लॉकडाऊनच्या माध्यमातून व अन्य उपाययोजना करुन ज्या पद्धतीने कोरोनावर मात करण्यास यश मिळविले. त्याचे अनुकरण लंडनमध्ये केले जात आहे, असे श्री. देसाई व सौ. प्रणाली यांनी सांगितले.
पंतप्रधानांनाही लागण : आता डिस्चार्ज
लंडनमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली. काही काळ त्यांची प्रकृतीही खालावली. अतिदक्षता विभागात दाखल करण्याची वेळ आली. आता त्यांची प्रकृती बरी होऊन ते घरीही आले आहेत. त्यांनी कोरोनाशी गांभीर्याने सामना करण्याचा निर्धार करून घरात राहा, असे आवाहन जनतेला केले आहे.