राज्यातच मूळ गावी, कामाच्या ठिकाणी नेण्यासाठी बसेसची व्यवस्था : मुख्य सचिवांचा आदेश
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातही लॉकडाऊन जारी झाला आहे. याचा सर्वाधिक फटका रोजंदारी कामगारांना बसत असून उपासमारीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊननंतर विविध जिल्हय़ांमध्ये अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांना राज्यात त्यांच्या निश्चित स्थळी बसने नेऊन सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यांनी शुक्रवारी याबाबतचा आदेश दिला.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून स्थलांतरित कामगारांना नेण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. यासंबंधीची अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत. केंद्र सरकारने 19 एप्रिल रोजी जारी केलेल्या आदेशानुसार आंतरराज्य कामगारांना राज्यातच स्थालांतरित करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील शहरांमध्ये वास्तव्यास असणारे कामगार गावी जाऊन शेती करण्यास इच्छुक असतील तर त्यांना देखील मूळ गावी परतता येणार आहे.
मात्र, केएसआरटीसीच्या बसेसमधून आसनसंख्येच्या केवळ 40 टक्के कामगारांची वाहतूक केली जाणार आहे. सामाजिक अंतर राखण्यासह सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लाऊज देऊन कामगारांना पाठविण्याची सूचना देण्यात आली आहे.
परप्रांतीय किंवा राज्यातील अनेक भागातील कामगार बेंगळूर, म्हैसूर, हुबळी, मंगळूर यासारख्या शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. अशा कामगारांना लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. यापैकी अनेक स्थलांतरित कामगार कुटुंबासह आपल्या मूळ गावी जाण्यासाठी मिळेल त्या वाहनाने, पायी, सायकलवरून निघाले. मात्र, सर्व जिल्हय़ांच्या सीमा बंद करण्यात आल्यामुळे त्यांना तेथेच अडकून पडावे लागले आहे. आता कोरोनाचे सीलडाऊन करण्यात आलेले भाग वगळता लॉकडाऊन अंशतः शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे या कामगारांना राज्यातच ते इच्छित असलेल्या ठिकाणी किंवा यापूर्वी काम करीत असलेल्या ठिकाणी जाण्याची सोय सरकारने केली आहे.