बाधित वाढल्याने सातारकर गंभीर
प्रतिनिधी/सातारा
सातारा जिल्हय़ात लॉकडाऊन सुरु झाला ती तारीख होती 22 मार्च. आता एक महिना 2 दिवस झालेत. या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी गेले आणि सातारा जिल्हय़ात कोरोना बाधितांची संख्या 22 वर गेली आहे. यामध्ये काही तालुके ग्रीन झोनमध्ये असले तरी जावली व कराड तालुक्यातील स्थिती संवेदशनील होवू पहात असल्याने जिल्हावासियांना चिंता लागली आहे. या स्थितीचा परिणाम सर्व तालुक्यांवर झाला असून सगळीकडे कडक लॉकडाऊन पाळण्याची मनस्थिती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. सातारा शहर देखील सवलतीचा काळ सोडता zदुपारी 2 नंतर चिडीचूप होत असून सुनसान झालेल्या राजधानी कोरोना हरवण्यासाठी एकजुटली आहे.
सातारा जिल्हय़ात सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनचा अर्थ समजून घेण्यात नागरिकांनी बराच कालावधी घालवला आहे. त्यात फक्त अशिक्षित नव्हते तर अगदी शिक्षित व उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू देखील होते. मात्र जसजसी बाधितांची संख्या वाढू लागली तशी प्रशासनाची जबाबदारी वाढत चालली आहे. पोलीस, आरोग्य विभागासह महसूल खाते तडफेने काम करत असून त्यांना आरोग्य सेवकांपासून स्वच्छता कर्मचारी, आशा, अंगणवाडीसेविका फिल्डवर सहभागी होवून साथ देत आहेत.
सातारा शहराचा विचार केला तर 23 मार्चला कॅलिफोर्नियावरुन आलेले एक वृध्द कोरोनाबाधित म्हणून समोर आले. 14 दिवसांनंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला व त्यानंतरचा रिपोर्टही निगेटिव्ह आला पण त्यांचे हृदयविकाराने निधन झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले. सध्या सातारा शहर व तालुका ग्रीनझोनमध्ये असला तरी मुंबई, पुण्यासह इतर शहरातून येणाऱया नागरिकांचा ओघ थांबलेला नाही त्यामुळे काळजी घेण्याची गरज आता आणखीन वाढली आहे. नाही नाही म्हणता कराड तालुक्याची स्थिती गंभीरतेकडे झुकू लागल्याने आता तिकडे 100 टक्के लॉकडाऊन आहे.
जिल्हय़ाची ही स्थिती पाहता सातारा शहरासह उपनगरातील नागरिकांना गांभीर्य कळू लागले असून एखादा, दुसरा अपवाद वगळता मुर्ख सोडल्यास सर्व नागरिक प्रशासनाला सहकार्य करत आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे गजबजलेले मध्यवर्ती बसस्थानक, भाजी मार्केट यार्ड, भाजी मंडई, पोवईनाका, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, आरटीओ कार्यालय, शाळा, महाविद्यालयांसह सर्व रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. कडक लॉकडाऊन पाळण्याशिवाय पर्याय नसल्याने राजधानी सुनसान वाटत असली तरी पुढील काही दिवस हे नागरिकांच्या हिताचे ठरणार आहे.
महिन्यापासून पोलीसदादा रस्त्यावरच
नागरिकांकडून लॉकडाऊनला प्रतिसाद मिळत असला तरी काहीजण त्यातूनही आम्ही किती मुर्ख आहोत याचे प्रदर्शन करण्यासाठी रस्त्यावर येतच आहेत. त्यांना कारवाईचा बडगा दाखवावाच लागत आहे. झोपडपट्टीत होमगार्डवर झालेल्या हल्ल्याचा नागरिकांनी निषेध केला आहे. मात्र, काहीही घडले तरी पोलीसदादा महिना झाले येईल त्या प्रसंगांना सामोरे जात रस्त्यावरच उभा आहे तर आरोग्य विभाग 24 तास अलर्ट राहून सेवा देत आहे.
सावध ऐका पुढील हाका
कोरोनाचा गुणाकार सोसणार नाही याचे भान आता सर्वांनाच आलेय. कराड शहरासह तालुक्याची झुंज आता सुरु झाली आहे तर जावलीतील निझरे कनेक्शन आता थांबावे हीच प्रार्थना जावलीकर करत आहेत. ज्या ज्या तालुक्यात अद्याप कोणीही कोरोनाग्रस्त नाही त्यांनी पुढील हाका सावधपणे ऐकून लॉकडाऊन कडकपणे पाळण्याची गरज आहे. शहरी असा व ग्रामीण असा तो भेटला तर कोणालाही सोडणार नाही त्यामुळे घरात बसून काही दिवसांची ही लढाई यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सज्ज रहा.