पाकचा माजी स्पिनर सकलेन मुश्ताकचा सवाल, भारत-पाक क्रिकेटचेही समर्थन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी ठरलेला गोलंदाज हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही तितकाच यशस्वी होतो. भारताचा सध्याचा सर्वोत्तम ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने आपली योग्यता सिद्ध करून दाखविलेली असूनही त्याला भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातून का बाहेर ठेवले जाते, हे मला समजत नाही, असे मत पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताकने व्यक्त केले आहे.
अश्विन हा आयपीएल संघातील नियमित खेळाडू असून जुलै 2017 पासून त्याला राष्ट्रीय संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. रवींद्र जडेजाच्या बाबतीतही हाच प्रकार घडला होता. पण तो आता पुन्हा संघात दाखल झाला असून अष्टपैलू असल्यामुळे तीनही फॉरमॅटमध्ये त्याला खेळायला मिळत आहे. ‘फिंगर स्पिनर असो अथवा मनगटी स्पिनर असो, दर्जा हा कायम टिकणारा असतो. तुमचे कौशल्य, सामन्यातील स्थितीचे पटकन आकलन होण्याची क्षमता या बाबी फार मोलाच्या ठरतात. हे गुण अश्विनकडे असूनही त्याला वनडे संघातून डच्चू दिला गेला तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले,’ असे ‘दूसरा’चा शोध लावणारा सकलेन मुश्ताक म्हणाला.
‘वनडेपेक्षा कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांना बाद करणे बरेचसे कठीण असते. पण ही कला अश्विनला चांगली अवगत आहे. धावा रोखण्याचे काम कोणीही करू शकतो. पण ज्याला बळी घेण्याची कला अवगत आहे तो धावा रोखण्याचे कामही उत्तम प्रकारे निभावू शकतो. अश्विन या दोन्ही गोष्टीत माहिर आहे. असे असताना तुम्ही त्याला संघाबाहेर कसे ठेवू शकता? संघातील जो कोणी सर्वोत्तम फलंदाज किंवा गोलंदाज असतो, त्याला पाठबळ देऊन त्याचे मनोबल उंचावत ठेवणे आवश्यक असते,’ असेही सकलेन म्हणतो.
अश्विनकडे दुर्लक्ष
2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर गोलंदाजीत वैविध्य आणण्यासाठी भारतीय निवड समितीने मनगटी स्पिनर कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांना अधिकाअधिक संधी दिल्याने अश्विन बाजूला फेकला गेला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघात या दोघांनीही मिळालेल्या संधीचा लाभ घेत आपले स्थान बळकट केलेले आहे. मात्र 2019 च्या विश्वचषक स्पर्धेपासून दोघेही एकाच वेळी अंतिम संघातून एकत्रितपणे खेळताना दिसलेले नाहीत. मायेदशात असताना अश्विन हा भारताचा नंबर वनचा कसोटी स्पिनर आहे. मात्र विदेशातील मालिकांत त्याचे संघातील स्थान निश्चित असत नाही. लक्षवेधी कामगिरी झालेली असतानाही गेल्या वर्षी वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या दोन कसोटींच्या मालिकेत त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. अगदी अलीकडे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दोन कसोटींच्या मालिकेतही तो एकच कसोटी खेळू शकला तर एका सामन्यात रवींद्र जडेजाला त्याच्या जागी खेळविण्यात आले होते.
‘काही वर्षांपूर्वी अश्विनला संघात स्थान देताना हरभजन सिंगला बाजूला करण्यात आले होते. आता अश्विनवरही तीच वेळ आणली गेली आहे. मात्र अनेक ऑफस्पिनर्सना त्याच्या जागी आजमावून पाहण्यात आले असले तरी त्याचा दर्जा त्यापैकी एकालाही दाखविता आलेला नाही. भज्जीला वगळण्यात आले तेव्हाही मला आश्चर्य वाटले होते. भज्जी व अश्विन या दोघांची शैली वेगवेगळी असली तरी अंतिम अकरामध्ये ते एकत्रितपणे सहज खेळू शकले असते. उजव्या हाताचे दोन जलद गोलंदाज एकत्र खेळू शकतात तर दोन ऑफस्पिनर्स का नाही खेळू शकत? असा प्रश्नही सकलेनने उपस्थित केला. हरभजन इतका दर्जेदार गोलंदाज होता की तो 700 बळींचा टप्पा (103 कसोटीत 413 बळी) सहजपणे गाठू शकला असता,’ असे सकलेन हरभजनबाबत बोलताना म्हणाला. हरभजन आता कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असून सध्या तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतोय.
पाककडे स्पिनर्सची वानवा
पाकिस्तानकडे एकेकाळी जागतिक दर्जाच्या गोलंदाजांची फळी होती, त्यात सकलेनचाही समावेश होता. पण सकलेनच्या दर्जाचा फिरकी गोलंदाज पाकला आजही मिळालेला नाही. मात्र अनिल कुंबळे व हरभजन सिंग यांच्यानंतरही भारताकडे दर्जेदार स्पिनर्सचा साठा आहे, असे तो म्हणतो. भारतीय संघ सध्या पाकपेक्षा खूपच असल्याचे सकलेनला वाटते. ‘तुमच्याकडे सध्या खूप चांगले स्पिनर्स आहेत. कुलदीप खूप प्रभावी गोलंदाज आहे तर अश्विन व जडेजा यांच्या कामगिरीत सातत्य दिसून येत असून ते जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. ते निश्चितच शंभर कसोटींचा टप्पा पार करतील, याची मला खात्री वाटते. पाकिस्तान मात्र याबाबतीत बरेच मागे पडले आहे. यासिर शहाने चांगले प्रदर्शन केले आहे. पण सध्या त्याचा फॉर्म हरवला आहे. शादाब हळूहळू प्रगती करीत आहे,’ असे सकलेन म्हणाला.
भारत-पाक सामने होण्याची गरज
माजी सहकारी शोएब अख्तर व शाहिद आफ्रिदी यांनी भारत-पाक क्रिकेट पुन्हा सुरू व्हावे अशी मागणी केली आहे. त्याला सकलेननेही सहमती दर्शविली आहे. ‘खेळाडू हे हिरो असतात आणि चांगले वर्तन, कृती ठेवणे हे त्यांचे काम असते. हार-जीत हा खेळाचा भाग असतो आणि क्रिकेट हे काही युद्ध नव्हे. त्यामुळे दोन्ही देशांनी क्रिकेट सुरू करावे, असे मला वाटते. यामुळे दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासही मदत होईल. याशिवाय दोन्ही देशांच्या मंडळांना आर्थिक फायदाही होऊ शकतो,’ अशा शब्दांत त्याने आपली बाजू मांडली.