वार्ताहर / कुदनूर
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात चंदगड तालुक्यातील अलबादेवी गावच्या युवकाचा आणि आजरा तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात कालकुंद्री येथील दोघेजण आल्यांच्या संशयावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अफवांना ऊत आला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. आजूबाजूच्या गावातून कालकुंद्रीतील ग्रामस्थांना प्रवेश नाकारला जात आहे. मात्र, कालकुंद्रीकरांपासून भीती बाळगण्याची गरज नसल्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर माध्यमांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका असेही सांगण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे कालकुंद्रीत सुरुवातीपासूनच काटेकोरपणे पालन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावच्या प्रवेश मार्गावर ग्रामपंचायत आणि दक्षता कमिटीच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी नाकाबंदी करून अनावश्यक फिरणार्यांना चांगला लगाम लावला आहे. तसेच अनोळखी व्यक्तींना गावात प्रवेश नाकारणे, ग्रामस्थांनी अनावश्यक घराबाहेर न पडणे, कामानिमित्त बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, स्वच्छतेबरोबर शासनांच्या नियमांचे पालन करत आरोग्याची काळजी घेणे आदी बाबींची ग्रामस्थांकडून योग्यप्रकारे खबरदारी घेतली जात आहे. मात्र, हारूर (ता. आजरा) येथील आढलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात कालकुंद्री येथील दोघेजण आल्याच्या संशयावरून परिसरात खळबळ उडाली आहे. तर सोशल मीडियावर अनेक अफवांना ऊत आला आहे. आर्थिक व्यवहारांसह वैद्यकीय सेवा आणि आवश्यक खरेदीसाठी कुदनूर, कोवाड येथे जावे लागते. मात्र, या गावांमध्ये कालकुंद्री ग्रामस्थांना प्रवेश नाकारण्यात येत असून, अत्यावश्यक सेवा मिळणेही कठीण झाले आहे.
‘त्या’ दोघांनी घेतली होती खबरदारी
हारूर ता. आजरा येथे अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या कालकुंद्री येथील दोघांनी आवश्यक ती खबरदारी घेतली होती. तेथे गेल्यानंतर ते कोणाच्याही संपर्कात आले नाहीत. तसेच तेथून आल्यानंतरही त्यांच्याकडून योग्यती खबरदारी घेण्यात आली होती. गावात आल्यानंतरगही ते कोणाच्याही संपर्कात आले नाहीत. त्या दोघांना इन्स्टिस्टूशनल क्वारंटाईन करून सोमवारी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब घेण्यासाठी हलविण्यात आले आहे.