प्रतिनिधी/ खेड
हजारो चाकरमान्यांना जिल्हय़ात आणून सोडणाऱया वाहनांवर अचानक कारवाईचा बडगा उगारत रविवारी रात्रीपासून ती भरणे येथे रोखण्यात आली. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. मुंबईत परतणाऱया वाहनचालकांची कागदपत्रे तपासण्यात आली. केवळ मालवाहतुकीची परवानी असताना प्रवासी वाहतूक केल्यामुळे वाहन चालकांविरुध्द तपासणी मोहीम सुरु झाली. दुपारनंतर या चालकांना नोटीस बजावून सोडण्यात आले. परवाना शर्तींचा भंग करुन रत्नागिरी जिह्यात प्रवासी वाहन आणल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा देण्यात आला. यामुळे वाहन चालकांना पुन्हा प्रवासी वाहतूक झाल्यास कठोर तपासणी करण्याचा प्रशासनाने इरादा व्यक्त केला आहे.
मुंबई, पुणे येथील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेकडोंच्या संख्येने चाकरमानी खासगी वाहनाने गावी येत आहेत. जिल्हय़ात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने कशेडी चेकपोस्टवरील तपासणीतील निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहेत. चाकरमान्यांना कशेडी चेकपोस्टवर अडवण्यात येत होते. याठिकाणी वाहनांची कसून तपासणी करून चाकरमान्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर लवेल येथील संस्थात्मक कक्षात विलगीकरण करण्यात येत होते. या साऱया प्रक्रियेस लागणाऱया विलंबामुळे चाकरमान्यांवरील व प्रशासकीय यंत्रणेवरील ताण वाढला होता. याचमुळे प्रशासनाने कशेडी चेकपोस्टवरील कडक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता.
कशेडी चेकपोस्टवरील निर्बंध शिथिल होताच मुंबई, पुणेतून येणाऱया चाकरमान्यांची संख्या कमालीची वाढली होती. यापाठोपाठ मुंबईकरांमुळे जिल्ह्य़ातील कोरोनाबाधितांची संख्याही झपाटय़ाने वाढू लागली. त्यामुळे पुन्हा कशेडी चेकपोस्टवरील निर्बंध पुन्हा कडक केले आहेत. पास नसलेल्यांना प्रवेश नाकारला जात आहे. दरम्यान,चाकरमान्यांना सोडून मुंबईकडे जाणाऱया वाहनांविरोधात रविवारी रात्री अचानक कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
मुंबईकडे जाणारी वाहने रोखण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्याने भरणे येथे ही वाहने रोखण्यात आली. सोमवारी सकाळीही ही मोहीम सुरूच होती. अडवण्यात आलेली सर्व वाहने गोळीबार मैदानात उभी करण्यात आली होती. या वाहनांनी गोळीबार मैदान ‘पॅक’ झाले आहे. यामध्ये ई-पास असलेल्या वाहनांचाही समावेश आहे. प्रशासनाच्या भूमिकेमुळे वाहनचालकही चक्रावले आहेत. या वाहनधारकांकडून कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
वाहनांची ‘आरटीओ’कडून तपासणी
रोखण्यात आलेली सर्व वाहने वाहनांची परिवहन विभागातर्फे तपासणी करण्यात आली. संबधीत कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. प्रशासनाकडून कुठल्याचप्रकारची सोय न करण्यात आल्याने वाहनचालकांना रणरणत्या उन्हात तिष्ठत बसावे लागले.
वाहनचालकांना नोटीसा
महामार्गावर भरणेसह अन्य ठिकाणी नाकाबंदी करून अडवण्यात आलेल्या खासगी बसेससह अन्य वाहनचालकांना जिल्हाधिकाऱयांच्या आदेशान्वये नोटीस बजावण्यात आल्या आहेत. पुन्हा जिल्हय़ात आल्यास गुन्हे दाखल करण्याची तंबी देण्यात आली आहे. मुंबईतून चाकरमान्यांना जिल्हय़ात पुन्हा घेऊ न देण्याच्या कडक सूचना खासगी बसेससह अन्य वाहनचालकांना बजावण्यात आल्या आहेत. यानंतरच दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास खासगी वाहने सोडण्यास सुरूवात होताच रखडलेल्या वाहनचालकांनी सुटेकचा नि:श्वास टाकला.
लोकप्रतिनिधींकडून दखल
महाडनाक्यावर वाहनांची झालेली गर्दी पाहून माजी आमदार संजय कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
मुंबईस्थित चाकरमान्यांची कोंडी
मुंबई, पुणेतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेकडोंच्या संख्येने चाकरमानी गावी येत आहेत. गाव गाठण्यासाठी चाकरमान्यांनी खासगी बसेससह अन्य वाहनांचा आधार घेतला आहे. मात्र परतीच्या प्रवासात वाहने अडवत असल्याचे कळताच मुंबईस्थित चाकरमानी दुहेरी कोंडीत अडकले आहेत. त्यातच पुन्हा जिल्हय़ात आल्यास प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्याचे संकेत देण्यात आल्याने वाहनचालक पुन्हा कोकणात येण्यास राजी होणार नाहीत. याचमुळे गाव गाठायचे तरी कसे? याची चिंता चाकरमान्यांना सतावणार आहे.
दापोलीत 27 गाडय़ांवर प्रतिबंधात्मक कारवाई
दापोली तालुक्यात सध्या चाकरमान्यांचा ओघ प्रचंड वाढला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये दापोलीत सुमारे 12 हजारहून अधिक चाकरमानी येऊन दाखल झालेले आहेत. हे चाकरमानी विविध गाडय़ांमधून दापोलीत येऊन दाखल होत आहेत. या गाडय़ांमध्ये खासगी बसेस, टेम्पो ट्रव्हलर, माल वाहतूक करणारे टेम्पो, डमडम व खासगी चारचाकी गाडय़ांचादेखील समावेश आहे. एवढय़ा मोठय़ाप्रमाणात दापोलीत चाकरमानी येऊ लागल्याने प्रशासनाची तारांबळ उडत होती. रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळपर्यंत या गाडय़ा दापोलीत येत होत्या. या गाडय़ा आधी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर अडवण्यात येत होत्या. तेथे प्रत्येक चाकरमान्यांची नोंद केली जात होती. यानंतर त्यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात उभारण्यात आलेल्या तपासणी केंद्रात पाठवण्यात आले. यामध्ये पोलीस व प्रशासनाची तारांबळ उडत होती.
सोमवारपासून दापोली बसस्थानकासमोरील तपासणी नाका बंद करण्यात आला. शिवाय या सर्व वाहनांना एकमार्गी विद्यापीठात पाठवण्यात आले. यामुळे बुरोंडी नाका परिसरात चाकरमानी व मुंबईतून आलेल्या गाडय़ांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. या गाडय़ा दापोलीत येऊन दाखल झाल्यावर पोलिसांकडून सर्व चालकांची लायसन्स जमा करून घेण्यात आली. यामुळे प्रथम काय चालले आहे हे कुणालाही कळले नाही.
प्रवाशांना इथे सोडून लगेच मुंबईला पळू इच्छिणाऱया चालकांची यामुळे मोठी गोची झाली. सकाळी या सर्व चालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यानंतर या सर्व वाहनचालकांना जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाने 149ची नोटीस बजावण्यात आली. ही प्रतिबंधात्मक नोटीस असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यांनी पुन्हा जिह्यामध्ये येऊन असा गुन्हा करू नये याकरिता ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. ही नोटीस बजावून या सर्व चालकांचे वाहन चालवण्याचे परवाने त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले व गाडय़ा मुंबईकडे पुन्हा पाठवून देण्यात आल्या. यामुळे ज्या गाडय़ा खेडोपाडी जाऊन इतर चाकरमान्यांना सोडणार होत्या त्या चाकरमान्यांचे या अचानक केलेल्या कारवाईने अतोनात हाल झाले. या गाडय़ा दापोलीतूनच मुंबईकडे रवाना करण्यात आल्या.
यानंतर जवळच्या गावातील चाकरमान्यांनी चालत जाण्याचा पर्याय निवडला, तर काहींनी गावात फोन करून दुसऱया गाडय़ा मागून घेतल्या व ते मार्गस्थ झाले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱया वाहनचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. यामुळे तरी बेकायदेशीररित्या चाकरमानी जिह्यांमध्ये आणणाऱया गाडय़ांना वचक बसेल, अशी आशा आता जिल्हावासिय बाळगून आहेत. आंबा, मच्छी, किराणा, औषधे यासारख्या अत्यावश्यक वस्तूंची वाहतुकीचीच फक्त परवानगी आहे. असे असताना मुंबईच्या गाडय़ांनी प्रवासी वाहतूक केल्याने सर्व चालकांविरुध्द भारतीय दंड विधान कलम 149 अन्वये कठोर कारवाईचा इशारा देणारी नोटीस देण्यात आली. त्यामुळे हे वाहन चालक तूर्त रत्नागिरी जिह्यात प्रवासी घेवून येण्यास धजावणार नाहीत. अशी अपेक्षा वरिष्ठ अधिकाऱयांनी व्यक्त केली.