ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्राद्वारे केली. हे पत्र राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.
ते आपल्या पत्रात म्हणाले की, मे महिना संपत आला तरी अजून परीक्षांचा निर्णय होत नाही आहे आणि त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे.
पुढे ते म्हणाले, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती गंभीर असून गेल्या दोन महिन्यापासून देशात लॉक डाऊन सुरू आहे. अजुन किती दिवस लॉक डाऊन राहील याची ही कल्पना नाही. लॉक डाऊन शिथिल केलं म्हणजे कोरोना संपला असं होत नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसचं परीक्षा रद्द करणे म्हणजे सरसकट विद्यार्थ्यांना पास करणे असं होत नाही. आधीच्या सेमिस्टरच्या किंवा महाविद्यालयांना घेतलेल्या अंतर्गत परीक्षांच्या गुणांनुसार किंवा त्यांना काही प्रोजेक्ट देऊन अशा इतर अनेक पद्धतीने अंतिम परीक्षांचा निकाल जाहीर करता येईल. मला खात्री आहे अनेक शिक्षणतज्ज्ञांनी या विषयीचे मार्ग तुम्हाला सुचवले असतील आणि जर तसं नसेल तर आमचं शिष्टमंडळ विद्यापीठांना यासंदर्भात नक्की मार्गदर्शन करेल, असे ही राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.
तसेच कोरोना संकटात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून या परीक्षा रद्द कराव्यात आणि यात कुठल्याही राजकारणाला तुम्ही थारा देऊ नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी या पत्राद्वारे केली आहे.