ऑनलाईन टीम / दिसपूर :
आसाममध्ये मागील चार दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुुळे ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, सात जिल्ह्यातील 22 गावे पूरग्रस्त झाली आहेत. 1.95 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याबाबतची माहिती दिली आहे.
सततच्या पावसामुळे आसामसह मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातील अनेक भाग पावसाने झोडपला आहे. सततच्या पावसामुळे आसाममधील धेमाजी, लखीमपूर, दरंग, नलबारी, गोलपारा, दिब्रूगड आणि तिनसुकिया जिल्ह्यांच्या एकूण 17 महसूल क्षेत्रातील 22 गावे पूरग्रस्त झाली आहेत. एकूण 1,94, 916 लोकांना पुराचा फटका बसला आहे. यांपैकी 9000 जणांना ढेमाजी, लखीमपूर, गोलपारा आणि तीनसुकिया जिल्ह्यातील मदत शिबिरात व्यवस्था करण्यात आली आहे.
मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातही अशाच प्रकारे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आसाममधील जवळपास 1007 हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली गेले असून, अंदाजे 16,500 पाळीव प्राणी आणि कुक्कुटपालनावर त्याचा परिणाम झाला आहे.