वृत्तसंस्था / मुंबई
जगभरात भारतीयांची सोने खरेदीची आवड हा कायमच चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्यामध्ये सोने आयातीमध्येही भारतीयांचाच टक्का अधिक राहिलेला आहे. यामध्ये आता भारतामधील जवळपास 37 टक्के भारतीय महिलांनी कधीच सोने व दागिने यांची खरेदी केलेली नाही, असे डब्लूजीसीच्या अहवालात पुढे आले आहे. परंतु त्यांनी खरेदी करण्याची इच्छा मात्र कायम ठेवली असून त्या भविष्यात सोने खरेदी करू शकतात, असेही अहवालात नमूद करण्यात आलंय.
देशामधील जास्तीत जास्त खरेदीदार हे ग्रामीण भागातील असून 30 टक्के महिला या शहरी भागातील आहेत. किरकोळ सोन्याचा व्यवहार करणाऱयांची संख्या अधिक असल्याची माहिती जागतिक स्वर्ण परिषद(डब्लूजीसी)यांच्या अहवालात नेंदवली आहे.
जागतिक शोध एजन्सी हॉल ऍण्ड पार्टनर्स यांच्यासोबत मिळून करण्यात आलेल्या संशोधनामध्ये 6000 पेक्षा अधिक लोकांशी संपर्क साधण्यात आला होता. यातील 18 ते 65 वयोमान असणाऱया लोकांची मते विचारात घेतली गेली. यासाठी फक्त भारतच नव्हे तर चीन आणि अमेरिकेतील सोने ग्राहकांसोबत चर्चा करण्यात आली आहे. सदर सर्वेक्षणामध्ये भारतीय महिला या सामान्य पातळीवर सोने खरेदीला पसंती देतात, असे समोर आले आहे.
कारण सोन्यामधील गुंतवणूक ही सुरक्षित आणि गुंतवणुकीचा चांगला पर्याय असल्याची मते भारतीय महिलांनी नोंदवली आहेत.