वीजमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी / पणजी
संयुक्त वीज नियमन आयोगाने जून महिन्यापासून वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव सरकारला दिला असून तो सध्या लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या संकटामुळे लोक सध्या धास्तावले असून अनेकांची मिळकतीची साधने बंद पडल्याने त्यांना वाढीव वीजदर परवडणार नाही, म्हणून जूनपासून करण्यात येणारी वीज दरवाढ रोखावी. त्याचा भार जनतेवर टाकू नये असे मत काब्राल यांनी व्यक्त केले आहे.
आयोगाने 1 मार्चपासून वीजदर वाढविण्याचा प्रस्ताव दिला होता. तथापि, तो कोरोनामुळे त्यावेळी पुढे ढकलण्यात आला होता. आता पुन्हा आयोगाने जूनपासून दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव सरकारला दिला आहे. दरवाढ रोखावी आणि सरकारने त्यासाठी अनुदान द्यावे. वीज ग्राहकांच्या सर्व गटांसाठी प्रति युनिटमागे 10 ते 15 पैसे दरवाढीचा आयोगाचा प्रस्ताव आहे. ही दरवाढ सरकारने सोसावी. ग्राहकांना जुन्याच दराने बिले द्यावीत, असेही डॉ. सावंत यांना सूचित केल्याचे काब्राल यांनी सांगितले.
विविध गटातील ग्राहकांकडे मिळून वीज खात्याची कोटय़वधीची बिलांची थकबाकी शिल्लक असून ती वसूल करण्यासाठी काहीतरी योजना लागू करण्याचा सरकारचा इरादा आहे. अनेक सरकारी खात्यांतील वीज बिले थकवली असून ती वसूल होण्याकरिता विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचे काब्राल म्हणाले.