वृत्तसंस्था/ नवी दिल्ली:
रॉबिन उत्थप्पा हा 2007 टी-20 विश्वचषक जेत्या संघातील सदस्य. त्याने यशाचे शिखर अनुभवले आणि संघातून, मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेल्यानंतर रसातळ काय असते, ते ही अनुभवले. सातत्याने तो नैराश्येशी झुंजत राहिला. आज ना उद्या संघात स्थान मिळेल, ही अपेक्षा त्याला त्यावेळी होती, आजही आहे. पण, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आत्महत्येचे असंख्य विचार, प्रचंड निराशा यावर त्याने जिद्दीने, संयमाने मात केली.
निवृत्ती न स्वीकारलेल्या, मात्र त्याचप्रमाणे 2015 नंतर भारतीय संघातून एकदाही न खेळलेल्या रॉबिन उत्थप्पाला यंदा आयपीएल आवृत्तीसाठी राजस्थान रॉयल्स संघाने 3 कोटी रुपयांना करारबद्ध केले. पण, आयपीएल स्पर्धा लांबणीवर टाकली गेल्याने उत्थप्पाही स्पर्धेच्या प्रतीक्षेत आहे. गुरुवारी त्याने रॉयल राजस्थान फाऊंडेशनच्या ‘माईंड, बॉडी अँड सोल’ या लाईव्ह सेशनमध्ये आपल्या अनेक चढउताराबाबत विस्तृत संवाद साधला. आघाडीवर येणाऱया या विस्फोटक फलंदाजाने आतापर्यंत 46 वनडे व 13 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
a‘या कठीण कालखंडातून बाहेर येण्याचा एक मार्ग म्हणून मी डायरी लिहायला सुरुवात केली. एक व्यक्ती म्हणून स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न सुरु केला. नेट्समध्ये जोरदार सराव सुरु केला. अर्थात, सामन्यादरम्यान धावा होत नसल्याने ही चिंता होती. चुकांचे परीक्षण करत होतो. पण, काही वेळा स्वतःचे दोष कबूल करणे, स्वीकारणे शक्य होत नाही. माझीही कदाचित हीच समस्या होती’, असे उत्थप्पाने पुढे नमूद केले.
प्रारंभी या नैराश्येवर मात करणे कष्टप्रद ठरले असले तरी उत्थप्पाने नंतर त्यावर मात केली आणि 2014-15 रणजी हंगामात त्याने सर्वाधिक धावांचा विक्रमही नोंदवला. प्रगती होण्यासाठी मार्गात अडथळे येणे आवश्यक असते, याचा त्याने येथे उल्लेख केला.