वार्ताहर / पुलाची शिरोली
पुलाची शिरोली येथील सुमारे तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली रहिवासी अतिक्रमणे कायम करावीत. यासाठी अतिक्रमण घरांचा व गट नंबरचा सर्वे करावा. अशी सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी इंचलकरंजी प्रांताधिकारी व हातकणंगले तहसीलदार यांना दिली. आमदार राजूबाबा आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिरोलीत रेणूका नगर, मकाजी मळा, सनद माळ, बाळूमामा मंदिर, पाण्याची टाकी आदी भागात गावातील व बाहेरून आलेल्या लोकांनी रहिवासी बांधकामे केली आहेत. या ठिकाणी सुमारे तीस वर्षी पूर्वी पासुन लोक वास्तव्य करीत आहेत. अशा सुमारे बाराशे चौसष्ठ घरांची नोंद ग्रामपंचायत मध्ये सरकारी भोगवटदार सदरी असेसमेंट पत्रकी झाली आहे. यामध्ये १९९५ पूर्वीच्या घरांची संख्या अधिक
तत्कालीन वेळो वेळच्या आजी – माजी लोक प्रतिनिधींनी अतिक्रमण धारकांना फाळा पावती व विज कनेक्शन दिले आहे. तसेच सन १९८८/ ८९ मधील शासन निर्णयानुसार सुमारे चारशे लोकांनाच लाभ होण्याची शक्यता आहे. त्यापैकीच लक्ष्मण रोहिदास यांना आँनलाईन उतारा प्राप्त झाला आहे. याच पद्धतीने सर्वांना लाभ मिळावा म्हणून सरपंच शशिकांत खवरे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार अजिंक्यतारा कार्यालयात इचलकरंजी प्रांताधिकारी खरात, हातकणंगले तहसीलदार प्रदिप उबाळे यांची बैठक घेऊन माहिती घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत सर्व अतिक्रमण धारकांचा व गट नंबरचा सर्वे करण्याची सुचना पालकमंत्री पाटील यांनी दिली.
याप्रसंगी आमदार राजूबाबा आवळे, सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, माजी जि.प. सदस्य महेश चव्हाण, मंडल अधिकारी बी.एल.जाधव, गाव कामगार तलाठी निलेश चौगुले, ग्राम विकास अधिकारी ए.एस.कठारे, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील , अविनाश कोळी यांच्यासह लोक प्रतिनिधी उपस्थित होते.
माजी आमदार अमल महाडिक यांनी येथील अतिक्रमणे कायम करावीत. म्हणून इंचलकरंजीचे तत्कालीन प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना ७ डिसेंबर २०१७ रोजी निवेदन दिले होते. पण त्या कामासाठी शासकीय अधिकार्यांना मुहूर्त सापडला नाही. त्यानंतर सुमारे अडीच वर्षां नंतर या प्रकरणाची हालचाल सुरू झाली आहे.