ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्य प्रदेशात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मध्य प्रदेशातील 50 जिल्ह्यातील 462 गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. या गावांमधील 951 जणांना आता पर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. तर 32 जणांनी आपला जीव गमावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या गावातील आरोग्य व्यवस्था सुधारित तथा स्ट्रोंग नसल्याने या महामारीवर नियंत्रण मिळवण्याचे सरकार समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे कुटुंब कल्याण मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दोन दिवसांपूर्वी दावा केला होता की भोपाळ सोडून बाकी पूर्ण मध्य प्रदेश कोविड 19 मधून सावरला आहे.
मात्र, आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आजच्या रिपोर्ट नुसार, मध्य प्रदेशातील 462 गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. यामध्ये 479 श्रमिक आहेत तर 472 अन्य ग्रामीण भागातील आहेत. तसेच आतापर्यंत 32 जणांचा बळी गेला आहे.
21 मे रोजी गावात कोरोनाचे 336 रुग्ण होतेे. त्यामध्ये 130 श्रमिक आणि 206 जण ग्रामीण भागातील होते. यावरून असे लक्षात येते की, मागील 22 दिवसात गावात कोरोना रुग्णांची संख्या तीन पटीने वाढली आहे.
दरम्यान, आता पर्यंत ग्रामीण भागातील 29,881 लोकांचे नमुने घेण्यात आले असून त्यातील 26,422 जणांचे रिपोर्ट आले आहेत. यातील 951 जण पॉझिटिव्ह आहेत.