प्रतिनिधी / सातारा
हवामानाचा अंदाज दिवसागणिक बदलत आहे. मान्सून उद्या येणार, मान्सून लांबणार, मान्सूनचा प्रवास सुरू झाला अशा बातम्या रोज कानावर धडकत असल्यातरी मान्सून मात्र अद्याप आला नाही. परंतु शुक्रवारी दुपारी झालेल्या मान्सूनपूर्व ढगफुटीसदृश पावसाने मात्र सायगाव, आनेवाडी विभागात चांगलीच दाणादाण उडवली. ओढय़ा-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पेरणी मात्र लांबणीवर जाणार आहे. दरम्यान, झालेल्या नुकसानीचे भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
7 जुनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होवून 10 पर्यंत संपूर्ण राज्यात पसरेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र जून महिना मध्यावर आला तरी मान्सून अजून आलेला नाही. निसर्ग चक्रीवादळामुळे एक-दोन झालेला पाऊस वगळता यावर्षी दमदार वळीवही झाला नाही. त्यामुळे शेतीची मशागतीची कामे रखडली होती. चक्रीवादळामुळे झालेल्या पावसाने मशागतीची कामे करुन शेतं पेरणीयोग्य केली होती. तर काही ठिकाणी पेरणीही सुरू झाली होती. परंतु मान्सून लांबत चालला असल्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेमुळे पेरणी करत नव्हता.
शुक्रवारी सकाळपासूनच उकाडा वाढल्यामुळे पाऊस येईल असा अंदाज होता. दुपारी 3 च्या सुमारास सायगाव, आनेवाडी परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आणि सर्वांचीच पळापळ सुरू झाली. तब्बल दिड तास ढगफुटीसदृश पाऊस पडल्यामुळे ओढे, नाले तुडुंब वाहू लागले. या ओढय़ांचा प्रवाह कित्येक शेतामध्ये शिरल्यामुळे शेती वाहून गेली आहे. यामुळे शेती पेरणीसाठी वाफसा लवकरच येणे शक्य नाही. तसेच रस्त्यावर तर डांबर दिसेनासे झाले आहे. या पावसामुळे झाडे पडली तर वीज प्रवाहही खंडित होण्याचे प्रकार घडले.
शेतीचे झाडे शेततळे
शेतीची नांगरट, फणपाळी करुन शेती पेरणीसाठी तयार ठेवली होती. पाऊस सुरू झाला की लगेच पेरणी सुरू करायची अशा विचारात असताना शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे बांध फुटून शेती वाहून गेली आहे. तसेच अनेक ठिकाणी ओढय़ाचे पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे शेताला तळय़ाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
रायगावचा भुयारी रस्ता पाण्यात
नेमिची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे यावर्षीही महामार्गावरील रायगाव येथील भुयारी रस्ता पाण्याखाली गेला आहे. याठिकाणी तब्बल तीन फुट पाणी साठल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. याबाबत अनेकवेळा रिलायन्सला पत्रव्यवहार करुन आंदोलन करुनही काही फरक पडला नाही. त्यामुळे या पावसाळय़ातही रायगावचा भुयारी रस्ता पाण्यातच राहणार यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले आहे.