वार्ताहर/ संगमेश्वर
देवरुख ते रत्नागिरी मार्गावरील पांगरी येथे धोकादायक वळणावर दरडी कोसळण्याचे काम सुरुच असून येत्या पावसाळय़ात हा मार्ग अधिक धोकादायक होण्याची शक्यता आहे. पहिल्याच पावसात ही दरड कोसळल्यानतर पुन्हा शनिवारी दरड कोसळली. त्यामुळे येत्या पावसाळयात दरडीचा धोका अधिक वाढला आहे.
देवरुख ते रत्नागिरी मार्गावर पांगरी येथील रस्ता धोकादायक आहे. वळणावळणाच्या रस्त्यामुळे अनेकवेळा पुढच्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने अपघात घडतात. पावसाळय़ात पांगरी येथे दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. सद्यस्थितीत या रस्त्याचे रंदीकरण व मजबुतीकरण सुरु आहे. धोकादायक वळणे हटवण्याचे काम सुरुच आहे. मात्र 2 दिवसापूर्वी झालेल्या चक्रीवादळ आणि पावसामुळे पांगरी येथील वळणावरील दरड रस्त्यावर कोसळली होती. त्यामुळे माती व दगड रस्त्यावर येवून थांबले. सद्यस्थितीत रस्त्याचे काम सुरु असल्याने लगेचच रस्ता सुरळीत करण्यात आला. मात्र पोकरलेला डोंगर अधिकच खाली येत आहे. पाऊस नसताना शनिवारी दुपारच्या दरम्यान माती कोसळण्यास सुरुवात झाली. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे धोकादायक फलक न बसवल्याने वाहनांची ये-जा सुरुच होती. वाहने जात असताना किंवा पादचारी चालत असताना दरड वाहनांवर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या रंदीकरणासह पावसाळ्य़ाच्या अगोदर धोकादायक दरडी पहिल्यांदा बाजूला करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. दरवर्षी पावसाळय़ात या ठिकाणी दरड खाली येवून वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच दरडींचा धोकाही अधिक असतो. त्यामुळे दरडींचे काम पहिल्यांदा हाती घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे.