प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र सरकारच्या उडानने बेळगाव विमानतळाला उडण्याचे नवे पंख मिळवून दिले. यामुळेच आज देशातील महत्त्वाच्या विमातळांमध्ये बेळगावचे नाव घेण्यात येते. कर्नाटकात बेंगळूरनंतर सर्वाधिक शहरांना जोडले गेलेले शहर म्हणजे बेळगाव. दिवसभरामध्ये 15 हून अधिक विमानांची ये-जा व 7 हून अधिक शहरांना विमानसेवा दिली जात असल्याने कर्नाटकात दुसऱया क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे.
जून महिन्यात बेंगळूर विमानतळावरून 30 हून अधिक शहरांना विमानसेवा सुरू आहे. दररोज 200 हून अधिक विमानांच्या फेऱया असतात. दुसरा क्रमांक बेळगाव तर तिसरा क्रमांक म्हैसूरचा लागतो. म्हैसूरमधून सध्या 5 शहरांना विमानसेवा सुरू आहे. दररोज 10 विमानांच्या फेऱया होत असतात. त्यानंतर गुलबर्गा, मंगळूर, बिदर या विमानतळांचा क्रमांक लागतो.
बेळगावच्या सांबरा विमानतळावरून बेंगळूर, पुणे, मुंबई, हैदराबाद, म्हैसूर, अहमदाबाद, इंदूर, अजमेर या शहरांना विमानसेवा सुरू आहे. बेळगाव एक व्यावसायिक बाजारपेठ असल्यामुळे प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे प्रवासीसंख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. अद्याप तिरुपती व कडाप्पा या शहरांना विमानसेवा सुरू नसून त्या सुरू झाल्यास प्रवाशांच्या संख्येत अजून वाढ होणार आहे.