प्रतिनिधी/ दापोली
निसर्ग चक्रीवादळ होऊन 25 दिवस लोटले तरी शासनाच्या मदतीचे पाच पैसेदेखील खात्यात जमा न झाल्याने नाईलाजाने उपोषणाला बसावे लागत असल्याचे दापोली तालुक्यातील उटम्बर, उंबरशेत व आतगाव ग्रामस्थांनी शनिवारी उपविभागीय अधिकारी शरद पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ग्रुप ग्रामपंचायत उंबरशेत हद्दीत वरील तीन महसुली गावे आहेत. निसर्ग चक्रीवादळामध्ये या तीनही महसुली गावांतील घरे व बागायती शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाच्या अधिकाऱयांनी गावात येऊन पंचनामे केले आहेत. मात्र 25 दिवस उलटून गेले तरी गरीब जनतेला शासनाकडून अद्याप निधी मिळालेला नाही. काही कार्यकर्ते व पुढारी तहसील कार्यालयात पाठपुराव्यासाठी गेले असता त्यांना अधिकाऱयांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. यामुळे गोरगरीब जनतेने कुणाकडे दाद मागायची?
आमदार योगेश कदम यांच्याकडून दोन दिवस अगोदर तहसील कार्यालयात नुकसान झालेल्या सर्व गावच्या सरपंच व ग्रामसेवकांना बोलावून त्यांच्याकडून नुकसान झालेल्या गावांच्या याद्यांचे वाटप करण्यात आले. मात्र याद्या वाटप करण्याअगोदर काही लोकांच्या खात्यात पैसे कसे जमा झाल। याचा खुलासाही या ग्रामस्थांनी मागितला आहे. तसेच उंबरशेत गावात झालेल्या नुकसानीची अद्याप सरपंचांना यादी देण्यात आलेली नाही. यादी मागायला आले असता अधिकाऱयांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. थोडे नुकसान झालेल्या गावांना तत्काळ निधी देण्यात आला. मात्र उंबरशेत, उटंबर व आतगाव या गावांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. येत्या आठवडाभरात तीनही महसुली गावांतील लोकांच्या झालेल्या घरे व बागायतीचे नुकसान झाल्याचा निधी नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा झाला नाही तर आठवडय़ानंतर तहसील कार्यालयासमोर तीनही गावचे ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसतील, असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.