प्रतिनिधी / चिपळूण :
तिवरे धरणग्रस्त पुनर्वसन वसाहत कामाला नोव्हेंबरपासून प्रारंभ केला जाणार आहे. यासाठी मुंबईतील सिध्दीविनायक ट्रस्टने एकूण 11 कोटी देण्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर धरण पुनर्बांधणी, मंजूर झालेला पूल, साकव, रस्त्यांची कामेही पावसाळय़ानंतर हाती घेतली जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली. दरम्यान, धरणफुटीनंतर वर्षभरात रखडलेल्या कार्यवाहीला कोरोना लॉकडाऊन कारणीभूत असल्याचे खासदार राऊत यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.
गतवर्षी झालेल्या तिवरे धरण दुर्घटनेत मोठी आर्थिक तसेच जीवितहानी झाली. दुर्घटनेनंतर दौऱयावर आलेल्या मंत्री, नेतेमंडळीनी मोठमोठी आश्वासने दिली. गुरूवारी या धरण फुटीला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र या वर्षभरात पुनर्वसन, पाणी, रस्ते, पूल, साकवांसह धरण पुनर्बांधणी यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. एकूणच राजकीय अनास्था या वर्षभरात दिसून आली. यासंदर्भात वर्षभरातील घडामोडींचा आणि एकूणच अनास्थेवर गुरूवारी ‘तरूण भारत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. वर्षभरातील रखडलेले सारे प्रश्न, पुढील वाटचाल याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीशी संपर्क साधला असता त्यांनी कोरोना लॉकडाऊनचे कारण दिले. त्याचबरोबर पावसाळय़ानंतर प्रत्यक्षात पुढील कामाला नक्कीच गती दिली जाईल, असा आशावाद व्यक्त केला.
ऑक्टोबरपर्यंत होणार ‘मॉडेल’ तयार : राऊत
यासंदर्भात खासदार राऊत म्हणाले की, मुळातच बरीचशी कामे मंजूर झालेली आहेत. मात्र मार्चमध्ये कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्याने ही कामे सुरू करता आलेली नाहीत. पुनर्वसन वसाहतीसाठी सुरूवातील पाच कोटी दिल्यानंतर आता सिध्दीविनायक ट्रस्ट आणखी सहा असे एकूण अकरा कोटी देण्याचे मान्य केले आहे. एकूण 56 जणांना घरे दिली जाणार आहेत. गावात जागा उपलब्ध झाल्यास तेथे 14 जणांना, अन्यथा अलोरे येथेच सर्वाना घरे दिली जाणार आहेत. घरांच्या दोन निविदा काढल्या गेल्या आहेत. उर्वरीत निविदा या आठवडाभरात निघणार आहेत. ऑक्टोबरपर्यंत मॉडेल घर तयार करून नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात घरांच्या कामाना सुरूवात केली जाणार आहे.
धरणाच्या पुनर्बांधणीचे कामही याच हंगामात हाती घेतले जाणार आहे. सध्याच्या धरण फुटलेल्या ठिकाणी आरसीसी भिंत बांधण्यात येणार असून त्याचा आऊटलेटही आरसीसी केला जाणार आहे. पूर्वी दगडांचे बांधकाम केले जायचे. मात्र आता नव्या मार्गदर्शक तत्वानुसार ती कामे आरसीसी केली जाणार आहेत. पाणीयोजनेची विहीर बांधून झालेली आहे. मात्र तिचे खोलीकरण करण्याची मागणी झाल्याने वाढीव निधीची तरतूर करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. याचबरोबर रस्ते, पूल, साकवांची मंजूर कामेही पावसाळय़ानंतर गती घेतील असे राऊत यांनी स्पष्ट केले.