असे म्हणतात की, चातक पक्षी फक्त पावसाच्या पाण्याचे थेंब पिऊन त्यावर जगतो. पावसासाठी व्याकूळ होतो. इतका की, कोणताही ढग आकाशात दिसला की, त्याकडे पाहून तो ओरडू लागतो. त्याच्या ह्या व्याकुळतेने ओरडण्यावरूनच कदाचित ‘चातकासारखी वाट पाहणे’ हा वाक्प्रचार रूढ झाला असावा. पण कवी मात्र चातकाकडे पाहून त्याला सुनावतो. रे रे चातक सावधान मनसा मित्र क्षणं श्रुयताम् अम्भोदा बहवो वसन्ति गगने सर्वे न एतादृशाः। केचिद् वृष्टभिरार्द्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद् वृथायं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः।। अर्थ -अरे चातकमित्रा, मी काय म्हणतो ते सावधचित्ताने ऐक. आकाशात भरपूर ढग असतात. पण ते सर्व एकसारखे नसतात. काही पावसाच्या वर्षावाने धरतीला भिजवतात, तर काही नुसतेच गर्जना करतात. म्हणून ज्याला ज्याला पाहतोस त्याच्या त्याच्यासमोर (पाण्यासाठी) दीनवाणेपणाने याचना करू नकोस! इथे वरवर पाहता कवी चातकाला उपदेश करत आहे. जो ढग दिसेल त्याच्याकडे पाण्यासाठी याचना करू नकोस, असे चातकाला सांगत आहे. पण प्रत्यक्षात हे माणसांनाही उद्देशून आहे. जी माणसे आपली गरज किंवा तहानभूक भागवण्यासाठी कोणाकडेही याचना करतात, त्यांनी योग्य माणसाकडेच याचना करावी. जी व्यक्ती विश्वासार्ह आहे, जिच्याकडे गेल्यावर आपल्याला रिकाम्या हाती किंवा विन्मुख परत यावे लागणार नाही अशा लोकांकडेच अडीअडचणीला हात पसरावेत. अन्य कोणत्याही व्यक्तीकडे गेलात, तर कोरडय़ा उपदेशाचे डोस पाजून परत पाठवतील. अन्योक्तीचा हा आणखी एक सुपरिचित श्लोक पहा. छायामन्यस्य कुर्वन्ति ति÷न्ति स्वयमातपे। फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषाः इव।। अर्थ- स्वतः उन्हात उभे राहतात आणि दुसऱयाला सावली देतात, ज्यांची फळेही दुसऱयासाठीच असतात, असे वृक्ष हे सत्पुरुषांप्रमाणेच असतात. वरील श्लोकात प्रत्यक्षात वृक्षांचे वर्णन केले आहे. झाडे नेहमी उन्हात उभी राहून त्याच्या आश्रयाला येणाऱया सर्व प्राणीमात्रांना सावली देतात, तर भुकेलेल्यांना आपली फळेही देतात. म्हणजेच स्वतःची कोणतीच गोष्ट तो स्वतःसाठी वापरत नाही. निसर्ग आपल्याला सारे काही देत असतो. पण माणसांकडे ती दानत नाही. त्याची वृत्ती दुसऱयाकडचे ओरबाडण्याची, लुटण्याची असते. पण फार दुर्मिळ माणसे अशी असतात की, त्यांनी वृक्षांप्रमाणेच आपले सारे आयुष्य दुसऱयांच्या हितासाठी झोकून दिलेले असते. अत्यंत निरीच्छपणे ते वागतात. त्यांच्याकडे कुणीही काही मागितले, तरी ते कोणताही विचार न करता ती गोष्ट त्याला देतात. एकप्रकारे फकिरी वृत्ती असते त्यांची. पण असे लोक फार दुर्मिळ आणि केवळ दुसऱयाचा विचार करणारे असतात. त्यांनाच सज्जन, सत्पुरुष, संत इ. म्हटले जाते. वरील श्लोक त्यांना चपखलपणे लागू होतो.
Previous Articleखादी मास्कची ऑनलाईन विक्री `
Next Article एअरटेलची प्लॅटिनम ग्राहकांसाठी खास योजना
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.