व्यापारी संकुलाची इमारत पाडताना पालिकेने विश्वासात घ्यावे! : पावसाळा, लॉकडाऊनमुळे दुकाने खाली करण्यात सुट द्या : पुन्हा दुकान गाळे देण्याची हमी मिळावी
मनोज चव्हाण / मालवण:
मच्छीमार्केट असलेली इमारत पाडण्यास आमची हरकत नाही, मात्र मच्छीमार्केटला लागून असलेली दुसरी व्यापारी संकुलाची इमारत पाडताना त्यात असणाऱया आम्हा व्यापाऱयांना विश्वासात घेणे आवश्यक होते. कोणतीही कल्पना न देता, थेट नोटीस बजावून आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे. नोटीस बजावलेल्या इमारतींच्या क्रमांकामध्ये एकही भाडेकरू राहत नाही. त्यामुळे नोटीस बजावणीही चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. नगरपालिका प्रशासनाने आमची बाजू समजावून घेऊन गेली 35 वर्षे जेथे आम्ही व्यवसाय केला, त्याच ठिकाणी पुन्हा आम्हाला भाडेतत्वावरच दुकानगाळे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी, अशी माफक मागणी घेऊन व्यापारी संकुलातील व्यापाऱयांनी शहरातील लोकप्रतिनिधींना साकडे घातले आहे.
मालवण बाजारपेठेतील भाजीमार्केटची इमारत धोकादायक बनल्याने ती पाडून तेथे नवीन भाजीमार्केट बांधण्याची कार्यवाही पालिकेकडून करण्यात येत आहे. याठिकाणी टेंडर प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. या इमारतीबरोबरच लागून असलेले व्यापारी संकुलही हटविण्याची नोटीस पालिकेने व्यापाऱयांना दिली आहे. या नोटीसीमध्येच चुकीची माहिती देण्यात आल्याची हरकत व्यापारी वर्गाने लोकप्रतिनिधींकडे नोंदविली आहे. तसेच न्यायाची अपेक्षाही केली आहे.
नगरपालिकेची नोटीस काय म्हणते?
नोटीस मिळाल्यानंतर आपण या इमारतीचा वापर त्वरित बंद करायचा आहे. नोटिसीच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत या इमारतीमधील आपले साहित्य सुरक्षितस्थळी हलवून, आपण या गाळय़ांचा ताबा नगरपरिषदेचे कर विभागप्रमुख यांच्याकडे सुपूर्द करायचा आहे. मात्र, गाळय़ांचा वापर सुरू राहिल्यास भविष्यात ही इमारत अथवा इमारतीचा कोणताही भाग कोसळून जीवित वा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी आपल्यावर राहील. या अनुषंगाने होणारी नुकसान भरपाई देण्यासाठी आणि इतर दंडास व शिक्षेस आपण पात्र व्हाल व त्यासाठी नगरपरिषद जबाबदार राहणार नाही, असे पालिकेने नोटिसीत स्पष्ट केले आहे.
व्यापाऱयांनी घेतली हरकत
व्यापाऱयांनी लोकप्रतिनिधींकडे घेतलेल्या हरकतींमध्ये म्हटले आहे, मालवण नगर परिषदेकडून 12 फेब्रुवारी आणि 26 जुलै रोजी अशा दोन नोटिसा प्राप्त झाल्या. त्या नोटिसांमध्ये त्यांनी आम्ही पालिकेच्या इमारत क्र. 642 मध्ये भाडेकरू असल्याचा उल्लेख आहे. मुळात ही इमारत नं. 642 मधील आम्ही भाडेकरू नाहीत. आम्ही पालिकेच्या स्वतंत्र इमारतीतील भाडेकरू आहोत. आमच्यात आणि पालिकेच्या झालेल्या ठरावाप्रमाणे आमच्याकडील दुकान गाळय़ांचा वार्षिक दस्त आम्ही पालिकेकडे भरणा करायचा असतो. त्याप्रमाणे वर्षानुवर्षे तो कर आम्ही पालिकेकडे भरत आलो आहोत. आम्हाला पालिकेकडे दस्त भरल्याच्या पावत्याही प्राप्त होतात. त्यामुळे आम्ही आमची दुकाने घर नं. 642 या इमारतीत चालवित नसून दुसऱया इमारतींमध्ये चालवितो. तरीही आम्हाला आमच्या दुकान गाळय़ांचा वापर त्वरित बंद करण्याचा तसेच त्यातील आमचे साहित्य अन्यत्र हलविण्याचा आणि आमच्या गाळय़ांचा ताबा पालिकेकडे देण्याचे निर्देश दिले आहेत. पालिकेच्या या नोटिसा कायद्याच्या लेखी चुकीच्याच आहेत. परंतु आमच्यावर घोर अन्याय करणाऱयाही आहेत, असे म्हटले आहे.
कोरोना काळात विस्थापीत होण्याची भीती!
कोरोनामुळे बाजारपेठेत मंदी आहे. मार्चपासून बराच काळ आमची दुकाने बंद ठेवावी लागली. त्यामुळे आर्थिक कुचंबणा झाली आहे. आम्ही सर्व लोक हे निम्न मध्यमवर्गीय गटात मोडणारे आहोत. दुकानगाळे हेच आमच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे. असा स्थितीत नोटिसांप्रमाणे आम्हाला आमचे गाळे खरोखरच बंद करायची वेळ येणार आहे. त्यामुळे गाळाधारकांना सुरक्षितता प्रदान होईल, अशी भूमिका घेणे गरजेचे होते. परंतु तसे न करता आधीच कोरोना महामारीमुळे होरपळून गेलेल्या छोटय़ा गाळाधारकांना आणखी मोठय़ा संकटात ढकलण्याची भीती भीती व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे.
लोकप्रतिनिधींकडून व्यापाऱयांच्या अपेक्षा
व्यापारी वर्गाने लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन दुकान गाळय़ांचा ताबा पालिकेकडे द्यावा लागू नये, असे प्रयत्न करावेत. पालिकेने दुकान गाळय़ांचा ताबा गैरमार्गाने घेतल्यास भविष्यात होणाऱया नवीन इमारतींमध्ये आणि तेथील गाळय़ांमध्ये आमचा भाडेकरूपणाचा हक्क राखून ठेवावा आणि त्या नवीन इमारतीमधील दुकान गाळे आम्हास द्यावेत, असा ठराव पालिका सभागृहात करावा. दोन वर्षांपूर्वी वेंगुर्ले नगरपालिकेनेही तेथील मच्छीमार्केट शेजारील गाळेधारकांबाबत असा ठराव केलेला आहे. तसाच मालवण पालिकेनेही दिलासादायक ठराव करावा, अशी अपेक्षा या व्यापाऱयांनी व्यक्त केली आहे.