प्रतिनिधी/ रत्नागिरी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांच्या स्वागताला जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून शासनाच्या धोरणानुसार चाकरमान्यांना कोकणात प्रवेश दिला जाणार आहे. कशेडी घाटात चेकिंगसाठी एसटी बस थांबवण्यात येणार नाही. गावात आलेल्या चाकरमान्यांनी सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. आरोग्य यंत्रणेवर मुळातच खूप ताण असल्याने सर्वांच्या सहकार्याने गणेशोत्सव यशस्वीपणे पार पाडूया असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले.
गणेशोत्सव नियोजनबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी मिश्रा यांनी बुधवारी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली. कोव्हीड लक्षणे असणाऱयांची अँटीजेन चाचणी केली जाणार असून कोरोना टेस्टींग लॅबची क्षमताही वाढवण्यात येणार आहे. गृह विलगीकरणाचा कालावधी 10 दिवस करण्यात आला असून येणाऱया लोकांमुळे संसर्ग होऊ नये म्हणून विलगीकरणाची क्षमता दुप्पट करण्यात येणार आहे. होम क्वारंटाईन व्यक्तींना बाहेर फिरण्यास परावानगी नसून भजन, आरती अशा कार्यक्रमातही त्यांना सहभागी होता येणार नाही. याबाबत कडक अंमलबजावणी केली जाणार असून त्यासाठी खासगी डॉक्टरांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
आयुर्वेदिक डॉक्टर, ग्रामीण यंत्रणेकडून 10 डॉक्टर घेण्यात आले आहेत. आयएमएच्या सहकार्याने नियोजन करण्यात येणार आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून स्वच्छता करणार तसेच 56 सफाई कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी खासगी हॉस्पिटलना परवानगी देण्यात आली आहे. या दहा दिवसात सुमारे दीड लाख चाकरमानी कोकणात येण्याची शक्यता आहे.
मेडिकल असोसिएशनने डॉक्टरांवर कामाचा ताण येईल म्हणून निवेदन दिले आहे. मात्र सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव यशस्वी करायचा आहे, यासाठी जिह्यातील सर्व डॉक्टर सहकार्य करणार आहेत. शासनाचे धोरण असल्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. प्रत्येकांनी खबरदारी घेत कोरोना पासून स्वतःला लांब ठेवायचे असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
तालुका पातळीवर स्क्रिनींग सेंटर
जिह्यातील 9 तालुक्याच्या ठिकाणी क्रिनिग सेंटर उभे करण्यात आले आहेत. याठिकाणी सामजिक संस्थांनी प्रशासनाच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी दिली.
कोरोना लॅबची क्षमता वाढणार जिल्हा शासकीय रुग्णालयात असलेल्या स्वॅब टेस्ट लॅबमध्ये 200 ते 250 रिपोर्ट येण्याची क्षमता असल्याने आणि मनुष्यबळ कमी असल्याने रिपोर्टला वेळ लागत आहे. आणखी एका मशीनची ऑर्डर देणायत आली असून येत्या आठवडय़ात दुसरी मशीन कार्यान्वीत होईल. त्यामुळे अहवाल येण्याची क्षमता व गतीही वाढणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले