दिवसभरात बरे होणाऱयांचे प्रमाण 51 हजारांवर : 857 रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूचे संकट आणखीनच गडद होताना दिसत आहे. मागील 24 तासांत देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत 52 हजार 509 इतकी मोठी भर पडली असून 857 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढीमुळे देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 19 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 19 लाख 8 हजार 254 वर पोहोचला आहे. त्यापैकी 5 लाख 86 हजार 244 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 12 लाख 82 हजार 216 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनावर अद्याप लस किंवा ठोस औषध उपलब्ध न झाल्याने बाधितांचा आकडा नियंत्रणात आणणे अद्यापही शक्य झालेले नाही. दिवसागणित रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत असले तरी अद्याप बाधितांची संख्या आटोक्यात आलेली नाही. कोरोना संसर्गामुळे देशात आतापर्यंत एकूण 39 हजार 795 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू येथे कोरोना बाधितांचा वाढता आकडा पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या चांगली असल्याने रिकव्हरी दर सुधारत आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार बरेच प्रयत्न करत आहे. कोविड-19 चे संकट कायम असल्यामुळे काही राज्यांमध्ये लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. आता अनलॉक-3 ला सुरुवात झाली आहे. अनलॉक-3 अंतर्गत नियमांत शिथिलता आणत अनेक सोयी-सुविधा सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणू संकटाने संपूर्ण जगाला जेरीस आणले आहे. त्यामुळे कोविड-19 लसीच्या विकासाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.