वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय मजलीस इतेहदुल मुसल्मीन या पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमानना याचिका सादर करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमी प्रकरणी हिंदूंच्या बाजूचा निकाल दिल्याने ओवेसी यांनी अश्लाघ्य टीका केली होती.
ही याचिका भारतातील दहशतवाद विरोधी आघाडीचे अध्यक्ष वीरेश शांडिल्य यांनी सादर केली आहे. राम जन्मभूमी प्रकरणी दिलेला निर्णय सर्व पुरावे आणि व्यवहारीक बाजू लक्षात घेऊनच दिला असून तो योग्य असल्याचे प्रतिपादन याचिकेत करण्यात आले आहे. न्यायालयाचा निर्णय विरोधात गेल्यामुळे ओवेसीनीनी न्यायालयावर शरसंधान केल्यामुळे न्यायालयाची अवमानना झाल्याचे म्हणणेही याचिकेत मांडण्यात आले आहे.
गेल्या वर्षी 30 जुलैला ओवेसी यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केले होते. कोटय़वधी भारतीयांची प्रभू रामचंद्र या देवतेवर श्रद्धा आहे. या श्रद्धेचा आदर करण्याची जबाबदारी ओवेसींसारख्या नेत्यावर आहे. मात्र त्यांचे वर्तन या जबाबदारीच्या पूर्ण विरोधात असल्याचे याचिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. ओवेसी यांच्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे देशात धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण झाले असून विविध धर्मिंयांमध्ये, विशेषतः हिंदू आणि मुस्लीमांमध्ये फूट पडून देशाच्या ऐक्याला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप शांडिल्य यांनी याचिकेत केला असून ती लवकरच सुनावणीसाठी येत आहे.