महाराष्ट्र व कर्नाटक सरकारमध्ये समन्वय, महापूर व कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यानंतर महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येईल
प्रतिनिधी/शिरोळ
गेल्या दोन वर्षातील महापूर स्थिती लक्षात घेतली तर दोन्ही राज्यातील सरकारमध्ये समन्वय नव्हता, मात्र सध्या महाराष्ट्रातील आघाडी सरकार व कर्नाटक राज्यातील भाजपा सरकार यांच्यात समन्वय आहे. त्या पद्धतीने पूर परिस्थितीबाबत आढावा घेतला जात आहे, यापूर्वी दोन वेळा आलेल्या महापुराच्या संकटाचा फटका कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील जनतेला सोसावा लागला होता याचा अनुभव लक्षात घेऊन या दोन्ही राज्यातील सरकारमध्ये समन्वय राखला आहे. यामुळेच संभाव्य महापुराचा धोका नसल्याची माहिती कर्नाटक राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना सौ शशिकला जोल्ले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली
येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल यादव यांच्या निवासस्थानी मंत्री जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले व बसवराज जोले यांनी सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना मंत्री जोल्ले म्हणाल्या, महापूर व कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात भाजपाचे सरकार अस्तित्वात येईल असा गौप्यस्फोट त्यांनी करून त्या म्हणाल्या की कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्र राज्यातही भारतीय जनता पक्षाचे सरकार हवे होते त्यामुळे राज्याचा सर्वांगीण विकास झाला असता असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने आगामी काळात राजकीय भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे
यावेळी यादव परिवाराच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, नगरसेविका विदुला यादव , पंडित काळे , डॉ अरविंद माने , विजय आरगे , महेश मोरे ,नाना कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते