वार्ताहर/ चिकोडी/निपाणी
कोरोना संकटातही समर्थपणे परीक्षेला सामोरे गेलेल्या दहावीच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. सोमवारी हा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये निपाणी तालुक्यातील डी. एस. नाडगे कॉलेज कारदगाची विद्यार्थिनी प्रतिज्ञा प्रकाश काशिद हिने 625 पैकी 622 गुण मिळवत मराठी विभागातून प्रथम तर सर्व विभागातून राज्यात चौथा येण्याचा मान पटकाविला. या निकालातून चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ाची 13 वरुन 30 अशी घसरण झाली. पण जिल्हय़ातील 4 विद्यार्थिनींनी राज्यात टॉपटेनमध्ये येण्याचा मान पटकावत सर्वांनाचा सुखद धक्का दिला.
चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ाचा निकाल पाहता 547 शाळांपैकी 142 शाळांचा निकाल ए ग्रेड, 164 शाळांचा निकाल बी ग्रेड तर 241 शाळांचा निकाल सी गेड लागला आहे. प्रथमच शिक्षण खात्याद्वारे शेकडावार निकालाऐवजी गेडनिहाय निकाल जाहीर करण्याचे ठरविल्याने थोडाफार गोंधळ झाला आहे. सर्व जिल्हय़ांची निकालाची यादी पाहता चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ाचा बी ग्रेडसह 30 वा क्रमांक लागला आहे. यावर्षी निकालात जरी घसरण झाली असली तरी सार्वजनिक शिक्षण खात्याने माध्यमनिहाय टॉपटेन रँकर्सची जी यादी जाहीर केली आहे, त्या यादीत चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ातील चिकोडी येथील एम. के. कवटगीमठ प्रौढ शाळेच्या सहना शंकर कामगौडा व के. आर. हुक्केरी प्रौढशाळा घटप्रभा येथील श्रृती बसगौडा पाटील यांनी दोन्ही विद्यार्थिनींनी 625 पैकी 623 गुण, रायबाग तालुक्यातील हारुगेरीच्या प्रगती प्रौढशाळेची दीपा पारिस नागनूर हिने 625 पैकी 622 गुण घेत शिक्षण खात्याच्या टॉपटेन रँकर्सच्या यादीत छबी उमटवली आहे.
कोरोनाचा निकालावर परिणाम
एस.एस.एल.सी. परीक्षेविषयी विद्यार्थी वर्गामध्ये परीक्षा होतात की नाही याविषयी साशंकता होती. तथापि सुमारे 2 महिने उशिरा परीक्षा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी कोरोनाची भीती बाळगत परीक्षा दिली. याचा निकालावर परिणाम झाला आहे. त्यामुळे चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ाची घसरण झाली. पण गुणवत्ता टिकविण्याची हमी जिल्हय़ातील 4 विद्यार्थिनींनी टॉपटेनमध्ये येऊन दिल्याचे समाधान आहे. यापुढील काळात पुन्हा निकालवाढीसाठी प्रयत्न करु, असे चिकोडीचे डीडीपीआय गजानन मण्णिकेरी यांनी सांगितले.
चौकट करणे
यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षकांना
राज्याच्या टॉपटेन यादीत स्थान मिळविलेल्या सहना कामगौडर हिने आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील व शिक्षकांना दिले आहे. डॉक्टर होण्याचा आपला मानस असल्याचे तिने तरुण भारतशी बोलताना सांगितले.
नियमित अभ्यास यशाचे गमक
प्राथमिक शाळेत असल्यापासूनच शिक्षक व पालकांच्या योग्य मार्गदर्शनातून अभ्यास करण्याचे धडे मिळाले. नवोदय परीक्षेतही यामुळे यश मिळविता आले. दहावीच्या परीक्षेची मनात कधीच भीती घेतली नाही. नियमित अभ्यास करत राहिले. याचेच फलीत म्हणून यश मिळाले, अशी प्रतिक्रिया प्रतिज्ञा प्रकाश काशिद हिने तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली.