निर्बंध हटवले : सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील विद्यार्थ्यांसाठी एसटीची सोय
प्रतिनिधी / कणकवली:
नीट परीक्षेसाठी गोवा हे सेंटर निवडलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना स्वॅब चाचणीशिवाय गोवा राज्यात प्रवेश किंवा सिंधुदुर्गमध्ये नीटसाठी परीक्षा केंद्र मिळावे, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकांजवळ केली होती. त्यानुसार केंद्रीय गृह सचिवांनी आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पासची गरज नसल्याचे स्पष्ट करत निर्बंध तात्काळ हटविण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत. याबाबत गोवा व महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांशीही चर्चा झाली आहे. त्यामुळे गोव्यात परीक्षेला जाण्यासाठी आता कोणतीही अडचण येणार नाही. तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षेला गोव्याला जाण्यासाठी बस उपलब्ध करण्याची सोय परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून करणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगतिले.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मिळून सुमारे 500 विद्यार्थी या नीट परीक्षेला बसले आहेत. हे दोन्ही जिल्हे डेंगराळ आहेत. येथे नेट कनेक्टिव्हिटीची समस्या आहे. या साऱयाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी गोवा केंद्राची निवड केली आहे. मात्र, गोवा सरकारने गोव्यात प्रवेशासाठी स्वॅब चाचणी अनिवार्य केली आहे. या पार्श्वभूमीवर आपण स्वत: तसेच खासदार विनायक राऊत यांनी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार पालकमंत्र्यांनी पत्राद्वारे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकांजवळ मागणी केली होती.
दरम्यान, केंद्रीय गृह सचिव अजय भल्लांनी 22 ऑगस्ट रोजी स्पष्ट केलेल्या नोटिशीनुसार आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवासी व वाहतूकीसाठी ई पासची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, काही राज्ये व जिल्हे वाहतूकीसाठी बंधने घालत आहेत. या पार्श्वभूमीवर गृह सचिवांनी महाराष्ट्र व गोव्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नीट परीक्षेला जाण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असे नाईक यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना गोव्यात परीक्षेला जाण्यासाठी बसची सोय करण्याच्या अनुषंगाने आपण परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांच्यासोबत चर्चा करून या विद्यार्थ्यांना बसची सोयही उपलब्ध करून देणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.