सांगरुळ / वार्ताहर
संपूर्ण जगात आणि देशात कोरोना विषाणू महामारीचे संकट आले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.अशा या अडचणीच्या काळात केंद्र शासनाने सप्टेंबर महिन्यात जेईई व नीटच्या मुख्य परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षतेला धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत केंद्रशासनाने ही परिक्षा न घेता ती रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार पी एन पाटील सडोलीकर यांनी केली आहे.
देशात कोरोना विषाणूने थैमान माजविले असताना शासनाने जेईई व नीटच्या मुख्य परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण देशभर कोरोना विषाणूपासून सुरक्षतेच्या कारणास्तव विद्यार्थी पालकामध्ये चिंता निर्माण झाली आहे.देशात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली असताना शासन ही परिक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे.विद्यार्थ्यांच्या आरोग्य पेक्षा परीक्षा महत्वाच्या नाहीत .अद्याप कोरोना विषाणू वर प्रभावी अशी लस तयार झालेली नाही.विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन कोरोनाचे संकट कमी होईपर्यंत परिक्षा घेऊ नये अशी मागणी आमदार पी एन पाटील यांनी केली आहे.