औद्योगिक संस्थेत, उद्योग समूहात व्यवस्थापकास सर्व व्यक्तींमध्ये सामंजस्य निर्माण करून स्नेहसंबंध निर्माण करणे आवश्यक असते. कर्मचारी किंवा कामगारांकडून एकत्रितरित्या परिणामकारकपणे काम करून घेण्यासाठी मानवी संबंधांचे ज्ञान आणि कौशल्य ज्यांना असते त्यांना उत्तम व्यवस्थापक असे म्हणतात. व्यावसायिक संघटना हा लोकांचा एक समूह असून ते विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीकरिता स्थापन केले गेलेले असतात. अनेक संघटनात विविध प्रकारचे लोक अथवा व्यक्ती कार्यरत असतात.
मनुष्याने पुन्हा त्याच्या मूळ स्वरूपाला प्राप्त करावे म्हणूनच श्रीसमर्थ रामदास स्वामींनी ग्रंथराज दासबोधातील काही दशकांची निर्मिती केली असावी. समर्थांच्या साहित्यात ते मनुष्याच्या विकृतीवर, अविवेकीपणावर आणि मनुष्यातील पशुवृत्तीवर घाव घालतात. समुद्रमंथन ज्यावेळी झाले तेव्हा देवांना अमृत मिळाले आणि ते अमर झाले. पण ह्या संसाररूपी समुद्रमंथनातले अमृत म्हणजेच दासबोध होय! श्री समर्थांनी मानवजातीच्या कल्याणाकरिता लिहिलेला ग्रंथराज दासबोध हा ज्या मानवाने आत्मसात केला त्यास अमृतप्राशनापेक्षाही अधिक सुख प्राप्त करून देऊ शकतो. म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात की, ‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे!’
व्यवस्थापनाच्या दृष्टीने सामूहिक उद्दिष्ट आणि वैयक्तिक उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने एकत्र आलेला मानवी समूह म्हणजेच मानवी संबंध होय! उद्योग समूहात अनेक व्यक्ती एकत्र येतात. त्यांची परस्परांशी देवाण घेवाण होऊन सहसंबंध निर्माण होतात. परस्परांचे विचार-विनिमय यातून जे सहसंबंध जोपासले जातात त्यास मानवी संबंध असे म्हणतात. अनेक व्यक्ती एकत्र येऊन जेव्हा सामंजस्याने काम करतात तेव्हा संघटनेचा विकास होतो. त्याऐवजी भांडण, कलह, हेवेदावे यामुळे व्यवसाय संस्थेची अधोगती होती. व्यवस्थापनात मानवी संबंधांना विशेष स्थान आणि आणि महत्त्व आहे. त्यामुळे मानवी संबंध चांगल्या रीतीने विकसित होऊ शकतात. मानवी संबंध हे उत्तम असतील तर संबंधित उद्योग समूहाची सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावते.
मानवी संबंध म्हणजे उद्योग समूहातील लोकांचे वर्तन स्पष्ट करणारा पद्धतशीर प्रयत्न आहे. तसेच व्यवस्थापन शास्त्रातील महत्त्वाचे क्षेत्र म्हणूनही मानवी संबंधांकडे बघितले जाऊ शकते. मानवी संबंधांमुळे लोकांच्या कामाच्या ठिकाणी विशिष्ट कार्य परिस्थितीत त्यांना एकत्र करून सहकार्याने आणि कार्यक्षमतेने काम करण्यास प्रोत्साहित करून आर्थिक, मानसिक आणि सामाजिक समाधान मिळवून दिले जाऊ शकते. श्रीसमर्थांनी मानवी संबंध कसे असावे ह्याविषयी दासबोधात असे सांगितले आहे की,
आपलें अथवा परावें !कार्य अवघेंच करावें !
प्रसंगीं कामास चुकवावें !हें विहित नव्हे!!
बरें बोलतां सुख वाटतें !हें तो प्रत्यक्ष कळतें !
आत्मवत परावें तें !मानीत जावें !!
कठीण शब्दें वाईट वाटतें !हें तों प्रत्ययास येतें !
तरी मग वाईट बोलावें तें !काय निमित्ते !! 21-22-23/10/12
म्हणजे, एखादे काम आपले किंवा दुसऱयाचे असो, ते मनापासून करावे. काम करण्याचा प्रसंग आला असेल तर कामचुकारपणा करू नये. शब्द गोड बोलल्याने मनाला आनंद होतो, हा प्रत्यक्ष अनुभव आहे. यावरून दुसऱयाला आपल्यासारखे मानावे. कठोर शब्द बोलल्याने वाईट वाटते, हासुद्धा अनुभव आहे म्हणून विनाकारण वाईट बोलू नये.
व्यवस्थापनशास्त्रात विशेषतः मानव संसाधनाच्या बाबतीत तर समर्थांच्या या ओव्या अगदी तंतोतंत लागू पडतात. उद्योग समूहातील कार्य पर्यावरणानुसार कर्मचारी वर्तन घडत असते. कर्मचारी किंवा कामगार हे आपापल्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून काम करत असतात. नवीन संधी अथवा व्याप्ती त्यांच्या कार्यात ते शोधत असतात. अनेकवेळेला उद्योग समूहातील वातावरण जर त्यांच्या शोधवृत्तीस सकारात्मक नसेल तर मात्र मूलभूत वादविवाद व्यवस्थापन आणि कर्मचारी/कामगार यांच्यात निर्माण होतो. उत्तम व्यवस्थापकाने कर्मचाऱयांच्या मनात हे रुजवावे की प्रत्येक काम हे आपलेच आहे असे समजून करावे, काम करत असताना सहकाऱयांशी सुसंवाद साधावा, विनाकारण कठोर शब्द बोलू नये. उद्योग समूहातील प्रत्येक व्यक्ती सर्वतोपरी भिन्न असल्याने त्या व्यक्तीचा स्वभाव, मूल्य, गरजा, विश्वास, दृष्टिकोन वेगवेगळे असतात. त्यामुळे एकाच प्रकारच्या उपक्रमास प्रत्येक व्यक्ती विविध पद्धतीने प्रतिसाद देत असतात. कामगारांना किंवा कर्मचाऱयांना काम करण्यास विविध मार्गानी प्रोत्साहन दिले जाते. कुठलाही व्यवस्थापक व्यक्ती परत्वे स्वतंत्र कार्यनीती अवलंबू शकत नाही. कारण प्रत्येक कर्मचाऱयाची किंवा कामगाराची प्रत्येक अपेक्षा ही कुठल्याही उद्योग समूहात परिपूर्ण केली जाऊ शकत नाही. म्हणूनच मानवी संबंधांचे उद्दिष्ट हे व्यवस्थापक आणि कर्मचाऱयांतील वैयक्तिक भिन्नता दूर करणे होय! उद्योग समूहातील प्रत्येक व्यक्ती ही भिन्न असल्यानेच अंतर्गत कलह निर्माण होतात. प्रत्येकवेळी व्यक्तीचे स्वभाव, गरजा आणि मूल्ये हे एकसारखेच नसतात. समूहात काम करत असताना लोकांचा एकमेकांशी संपर्क होऊन त्यांच्यात जी विचारांची देवाण-घेवाण होते त्यावेळेस कामाच्या ठिकाणी मतभेद निर्माण होतात. तेव्हाच खऱया अर्थाने अंतर्गत कलहास सुरुवात होते. त्यातूनच गटबाजी, द्वेष आणि असहकार्य या दुष्प्रवृत्ती निर्माण होतात. उत्तम मानवी संबंध हे अंतर्गत कलह कमी करून परस्परसंबंधांचा विकास घडवून आणू शकते. उद्योग संघटनांमध्ये औपचारिक आणि अनौपचारिक गट कार्यरत असतात. अनेकवेळा अनौपचारिक गटांमुळे व्यवस्थापकावर दबाव आणि नियंत्रण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. जर अनौपचारिक गटांना व्यवस्थापकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर वादविवाद किंवा कलह निर्माण होण्याची शक्मयता जास्त असते. संबंधित उद्योग समूहातील मानवी संबंधांचा विकास झाला असेल तर मात्र हे वाद-विवाद टाळता येतात. ज्या व्यवस्थापकास कीर्ती मिळवायची असेल त्यांना केवळ स्वतःपुरता विचार करून चालत नाही तर संपूर्ण उद्योग समूहाचा विचार करावा लागतो. संकुचित मनोवृत्ती ही खूप काळ तग धरू शकत नाही. त्यात गती नसते आणि जी विचारसरणी गतिमान नाही त्या विचारसरणीचा अवलंब करणारे अनुयायी हे कधीच प्रगती साधू शकत नाहीत.
आपण भाग्यवान आहोत की आपल्याला मानवजन्म मिळाला, हे आपले सद्भाग्य आहे की आपण भारतीय हिंदू संस्कृतीत जन्माला आलो आहोत आणि हे आपले महद्भाग्य आहे की श्री समर्थांनी ग्रंथराज दासबोध आपल्या कल्याणाकरिता लिहून ठेवला आहे.ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंद म्हणतात की माणूस कमावणे हीच खरी संपत्ती आहे तीच गोष्ट श्रीसमर्थांनी दासबोधात लोकसंग्रह करण्यास सांगितली आहे. लोकसंग्रहाची सुरुवात ही कुटुंबापासून व्हायला हवी. जिथे एक विचार आणि एकवाक्मयता असते त्या उद्योग समूहाचे मानसिक स्वास्थ्य हे नेहमीच उत्तम असते. दुर्दैवाने सगळीकडेच हे घडताना दिसत नाही. कारण, अनेकवेळा प्रत्येकाचेच अहंकार हे उद्योग समूहापेक्षाही मोठे होतात. त्यामुळे उद्योग समूहात, संस्थेत किंवा संघटनेत जर एकमेकांविषयीचे प्रेम, जिव्हाळा, ओलावा ह्या गोष्टींना तिलांजली दिल्या गेली तर भयानक चित्र निर्माण होऊ शकते. ह्यावर खूप सोपा उपाय म्हणजे मनाचे श्लोक आणि सातत्याने श्रीमद् दासबोधाचा अभ्यास करणे.
माधव किल्लेदार