प्रतिनिधी/ बेळगाव
सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. सरकार दरबारी हा दिवस शिक्षकांना पुरस्कार, गौरव या कार्यक्रमांनी साजरा केला जातो. मात्र शाळा स्तरावर या दिवसाचा उत्साह काही निराळाच असतो. एक दिवसाची ती शाळा, एक दिवसाचा शिक्षक, आणि एक दिवसाचे विद्यार्थी हा वेगळा उपक्रम असतो. विद्यार्थ्यांनीच शिक्षक बनायचे आणि आणि शाळा सांभाळायची असे ठरलेले असते. मात्र कोविड 19 च्या संकटछायेत एक दिवसाचा शिक्षक हरवून गेला. वर्षभर विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे शिक्षक या दिनाच्या निम्रित्ताने एक दिवस बघ्यांच्या, मार्गदर्शकांच्या भूमिकेत असतात. मात्र आता विद्यार्थीच शाळेत नसल्याने यंदाचा हा उपक्रम एक दिवसाच्या शिक्षकाविनाच साजरा होणार आहे.
शिक्षण विभागातर्फे शिक्षक दिन कशा पद्धतीने साजरा करावा याबाबतची मार्गसूची आठ दिवसापुर्वीच जाहीर करण्यात आली असून जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शिक्षक दिन साजरा करताना शिक्षकांची मर्यादा तसेच कोविड 19 चा धोका ओळखत त्रिसुत्रीची अंमलबजावणी याबाबी अधोरेखित केल्या आहेत. यामुळे दरवर्षी सरकारी स्तरावर मोठया प्रमाणात दिवसभर विविध उपक्रमांनी साजरा होणारा शिक्षक दिनाचा सोहळा या संकटात लॉकडाऊन झाला आहे. मार्च महिन्यापासून बंद असणाऱया शाळा आणि शैक्षणिक स्थिती सातत्याने समोर येत आहे. मात्र शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार नियोजित कार्यक्रम शाळा स्तरावर शिक्षकांकडूनच साजरे केले जात आहेत. यामुळे शिक्षक दिनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांविना शिक्षकांकडूनच शाळा स्तरावर मार्गसूचीनुसार पार पडणार आहे.
शाळांचे उपक्रम संकटात
गतवर्षी अतिवृष्टी आणि यामुळे निर्माण झालेली पुरस्थिती यामुळे शाळांच्या इमारती अडचणीत होत्या मात्र सध्या कोरोनामुळे विद्यार्थ्यांविना शाळा रिकाम्या आहेत. मात्र यावरुन शिक्षक विना विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांविना शिक्षक ही संकल्पनाच नसल्याचे अधोरेखित होत आहे. शिक्षक दिनानिमित्त आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त केला जातो. शिवाय गुलाब पुष्प तसेच भेटवस्तु देऊन आपल्या शिक्षकांप्रती आदरांची भावना व्यक्त केली जाते. यामुळे शिक्षक दिनाचा सोहळा हा शाळास्तरावर काही निराळाच असतो. मात्र यंदाच्या परिस्थितीमुळे शाळांचे उपक्रम संकटात असून विद्यार्थीरुपातील एक दिवसाचा शिक्षक आणि शिक्षकरुपातील एक दिवसाचा विद्याथीं हरवून गेला आहे.