सत्याचा नेहमी विजय होतो असे म्हणतात, पण त्याच वेळी सत्य बोलणारा बाराच्या भावात जाऊ शकतो असे वि. आ. बुवा यांनी एका कथेत गमतीने म्हटले आहे. त्या चालीवर संशोधन शाश्वत राहते. मर्त्य असल्याने संशोधक केव्हा तरी मरण पावतो असे म्हणायला हरकत नाही. याच्या बरोबर उलट घडलेली घटना मी सांगणार आहे.
काही दशकांपूर्वी एक तरुण कारकून विमा कंपनीत नोकरीला होता. त्याची क्लेम्स विभागात नेमणूक झाली होती. म्हणजे एखादा विमेदार मरण पावला की त्याच्या वारसांकडून योग्य कागदपत्र मिळवायचे आणि त्याला क्लेमची रक्कम द्यायची. हे काम करता करता काही वर्षांनी त्याला एक कल्पना सुचली. विमेदार मरण पावल्यावर त्याचे वारस मृत्यूचा दाखला आणि इतर कागद घेऊन येत. कंपनीच्या दप्तरात विमेदाराच्या जन्मतारखेची नोंद असे. या कारकुनाने क्लेमचे काम झाल्यावर वारसांना विनंती करून विमेदाराची जन्मकुंडली मागायला सुरुवात केली. एका वहीत विमेदाराचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, जन्मस्थान, जन्मकुंडली, मृत्यूची तारीख आणि मृत्यूचे कारण लिहून ठेवू लागला. हेतू हा होता की दहा-पंधरा हजार विमेदारांचा असा डाटा गोळा केल्यावर नामवंत ज्योतिष्यांना द्यायचा. त्याचा अभ्यास केल्यावर ज्योतिष्यांना जन्मकुंडलीवरून मृत्यूच्या तारखेचा अंदाज करता येतो का, बघायचे.
त्याला अनेक वारसांनी प्रतिसाद दिला. भरपूर कुंडल्या जमल्या. काही दिवसांनी त्याला प्रमोशन मिळून बदली झाली. नव्या ठिकाणी त्याने हाच क्रम चालू ठेवला. अशी काही वर्षे गेल्यावर तो क्लास वन ऑफिसर बनला. आता मात्र पंचाईत झाली. तीही त्याला नकळत. पूर्वी कारकून असताना त्याचे टेबल इतरांच्यारांगेत असे. ऑफिसर झाल्यावर टेबल थोडे बाजूला लावले गेले. क्लेमचे पैसे दिल्यावर तो वारसांना कुंडली मागायचा. काही वेळा वारस ऑफीस सुटल्यावर कुंडली आणून द्यायचे. विम्याच्या बाबतीत अनेकदा वारस महिला असतात. कुंडली देताना त्या भावनावश होऊन रडू वगैरे लागल्या की हा संकोचून जाई.
हाताखालच्या कर्मचाऱयांचा गैरसमज झाला. त्यांच्यात कुजबुज झाली. एके दिवशी त्याला वरि÷ अधिकाऱयांनी बोलावून ‘तू क्लेम देताना पैसे खातोस का?’ असा आरोप केला. त्याची क्लेम विभागातून रातोरात बदली झाली. त्याच्या टेबलाचा खण तपासताना वरि÷ांनी त्याच्या वह्या जप्त व नष्ट केल्या.
तो सहीसलामत रिटायर झाला. पण त्याच्या संशोधनाचा मृत्यू झाला.