प्रतिनिधी/ मंडणगड
नारळी पौर्णिमेला मासेमारीच्या नव्या हंगामास सुरुवात झाली हे वास्तव असले तरी समुद्रातील अंर्तगत हालचालीमुळे मासे मिळत नसल्याने तालुक्यातील वाल्मिकीनगर येथील मासेमारी करणाऱया बहुतांश बोटी नदीकिनारी उभ्या करण्यात आल्या आहेत.
सावित्री नदीच्या किनारी असलेल्या वाल्मिकीनगर या तालुक्यातील एकमेव गावाचा अर्थार्जनाचा मुख्य मार्ग मासेमारी हाच आहे. येथील कोळी समाजाचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आजही समुद्रातून मिळणारे मासे हेच आहे. येथील कोळी बांधव मासेमारी करण्यासाठी दररोज समुद्रात शंभर ते दीडशे किलोमीटरपर्यंत जात असतात. मात्र गेल्या आठवडय़ात मासे मिळण्याचे प्रमाण घटल्याने खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणे कोळी बांधवाना परवडेनासे झाले आहे. त्यामुळे नौका नदीच्या काठावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.
पर्यावरणात सातत्याने होणारे बदल माशांच्या घटीसाठी कारणीभूत ठरले असल्याने वाल्मिकीनगरातील मच्छीमार बांधवांवर वेगळेच संकट उभे राहिले आहे. अधिक महिन्यात या परिस्थितीत सुधारणा होईल, अशी मच्छीमार बांधवांची अपेक्षा आहे.