पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता गेला वाहून
सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज
प्रतिनिधी / वैराग
रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वैराग उस्मानाबाद राज्य मार्गावरील मालेगाव येथील पाटील वस्तीजवळ रस्त्यांच्या दुतर्फा जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता वाहुन गेल्याने वैराग, उस्मानाबाद, तुळजापूर वाहतूक बंद झाली आहे.
यापूर्वी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागास सांगूनही दक्षता न घेतल्याने व रस्त्यांचे दोन्ही बाजुला मोठी चारी काढून न दिल्याने हा रस्ता उध्वस्त झाल्याचे प्रवाशी व ग्रामस्थांचे मत आहे. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे मालेगाव ओढ्याजवळ रस्त्यांचे दोन्ही बाजूने पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की ओढ्याच्या पुलाखालून पाणी वाहून जाण्यासाठी टाकलेले पाईप उघडे पडून ओढया जवळ मोठे भगदाड पडले आहे. दगड गोटे, मुरूम व माती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याने रस्त्यांवर भळी पडल्या आहेत. मध्यरात्री झालेल्या पावसात या मार्गावरुन वाहतूक कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अन्यथा नकळत अंधारात ओढ्यातील पाण्याबरोबर वाहन जाऊन कोकणातील सावित्री सारखा मोठा धोका झाला असता. वैरागहून मराठवाडयाला जोडणारा तुळजापूर, उस्मानाबाद मार्ग बंद झाल्याने अनेक प्रवाशांचे हाल झाल्याचे दिसून आले.