ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यावर टीका केल्यानंतर पाकचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना घेरायला सुरवात केली आहे. नवाज शरीफ हे भारताचे एजंट आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते गुपचूप बोलतात, असा आरोप रशीद यांनी केला आहे.
रशीद म्हणाले, नवाझ शरीफ यांचे लष्करविरोधी भाषण भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार प्रसिद्ध झाले. स्वतःच्या देशातील लष्करावर जोरदार टीका करणारे नवाझ शरीफ हे भारताचे एजंट आहेत. ते मोदींना देशाबाहेर गुपचूप भेटतात. शरीफ यांनी देशात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ते मोदींशी काय बोलतात, याची माहिती देशासमोर द्यायला हवी. तसेच शरीफ यांनी ओसामा बिन लादेनला किती वेळा भेटले आणि कतारकडून किती देणगी मिळाली, हे देखील देशाला सांगितले पाहिजे.
रशीद यांच्यानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही शरीफ यांना लक्ष्य केले आहे. शरीफ यांनी पाकिस्तानी लष्करावर टीका करून भारताची बाजू घेतली असल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे.