भाजप प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांची टीका
प्रतिनिधी/ पणजी
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे अधिकृत भेटीवर गोव्यात आलेले आहेत. येथील शेतकऱयांच्या समस्या ऐकण्यासाठी ते आलेले आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी प्रमाणे सुट्टी घालविण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे ते थांबलेल्या हॉटेलच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करण्याची काँग्रेसची पद्धती अत्यंत चुकीची होती, अशी टीका भाजप प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी केली असून त्याचा कठोर शब्दात निषेध केला आहेत.
भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस गजानन तिळवे आणि एससी मोर्चाचे सिद्धेश पेडणेकर त्यावेळी उपस्थित होते. मंत्री जावडेकर थांबलेल्या हॉटेलवर जाऊन आंदोलन करण्यापेक्षा काँग्रेस युवा नेत्यांनी त्यांची योग्य भेट ठरवून त्यांच्याशी चर्चा करता आली असती. परंतु महात्मा गांधीजींची जी तत्वे आणि शिकवणीचा पुरस्कार काँग्रेसकडून करण्यात येतो त्यांना नेमके गांधी जयंतीच्या दिवशीच त्यांनी आपल्या कृत्याद्वारे तिलांजली दिली आहे, त्यामुळे यापुढे महात्मा गांधीजींचे फोटो आपल्या कार्यालयात लावण्याचा अधिकार काँग्रेसने गमावला आहे. काँग्रेसने आपली वृत्ती दाखवून दिली असून त्यांचे पितळ उघडे पडले आहे, असे श्री. नाईक म्हणाले.
आंदोलने करण्याचे अनेक मार्ग, पद्धती असतात. मंत्री जावडेकर यांचे राजकीय कार्य एखाद्यास आवडलेले नसेल तर त्यांनी त्या व्यासपीठावरूनच विरोध केला पाहिजे. तो विरोध त्यांच्या घरापर्यंत नेणे चुकीचे आहे. परंतु काँग्रेसच्या कथित युवा नेत्यांनी तेवढेसुद्धा सौजन्य न दाखवता ते राहिलेल्या ठिकाणी हॉटेलच्या बाहेर निदर्शने करून आपला बालीशपणा दाखवून दिला आहे, अशी टीका श्री. नाईक यांनी केली.
आम्ही रस्त्यावर उतरलो तर काँग्रेसला नाकीनऊ येईल : दत्तप्रसाद
भारतीय जनता पार्टीने काँग्रेसचे कोणीही नेते आलेले असताना आजपर्यंत असे प्रकार कधीच केलेले नाहीत. अशावेळी आम्ही रस्त्यावर आलो तर काँग्रेसला पळताभूई थोडी होईल, असा इशारा नाईक यांनी दिला.
गजानन तिळवे यांनी बोलताना, देशात आजपर्यंत घडलेले मोठमोठे घोटाळे हे युपीए सरकारच्या कार्यकाळातच घडलेले आहेत. देशात आणिबाणी लावणारी काँग्रेसच होती. गोव्यातही काही काँग्रेस नेत्यांनी काणकोण येथे आलेल्या पुराच्यावेळी जमविलेल्या मदत निधीत मोठा घोटाळा केला होता. त्याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे सांगितले.