विशेष प्रतिनिधी/ देवरुख
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात संगमेश्वरला होणाऱया वाढीव भूसंपादनाला व्यापाऱयांचा विरोध आहे. स्थानिक पातळीवर कोणीही नेता यात जातीने लक्ष घालत नसल्याने अखेर भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष, माजी आमदार प्रमोद जठार हे व्यापाऱयांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. नुकतीच जठार यांनी संगमेश्वरला येत व्यापाऱयांची बैठक घेतलीच शिवाय प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर ते व्यापारी प्रतिनिधीसह कार्यकारी अभियंता यांची भेट घेण्यासाठी रत्नागिरीत रवाना झाले.
यावेळी त्यांच्यासह भाजप जिल्हा उपाध्यक्ष हरिभाई पटेल, तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, डॉ. अमित ताठरे, राजन कापडी, विवेक शेरे, दिलीप रहाटे, प्रमोद शेटय़े, रिंकु कोळवणकर, संदेश कापडी, नवनाथ शेटय़े, मधुकर देवरुखकर, पपु सप्रे, स्वप्नीलबच्चु सैतवडेकर, ओमकार भिडे, दीपक भिडे यांच्यासह बहुतांश सर्व व्यापारी उपस्थित होते. बैठकीत सर्व व्यापाऱयांनी आमचा चौपदरीकरणाला कोणताही विरोध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र पूर्वी ज्याप्रमाणे ठरले आहे त्याच प्रमाणात जागा संपादन करुनच हे चौपदरीकरण व्हावे अशी आमची मागणी आहे. नव्या मापाने चौपदरी करण झाल्यास संगमेश्वरची ग्रामदेवता जाखमाता देवी मंदिर, पैसाफंड हायस्कूल, संभाजी स्मारक याचा बराचसा भाग जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर संगमेश्वरला काय चाललय हे आम्हाला समजतच नव्हते मात्र आमचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाई पटेल यांनी सातत्याने माझ्याशी संपर्क ठेवून हा प्रश्न मांडला. त्यावरून आज इथे येण्याची संधी मिळाली असे जठार यांनी सांगितले.
दरम्यान आज आमची कार्यकारी अभियंता यांच्यासोबत रत्नागिरीत बैठक होती मात्र प्रत्यक्ष स्थिती पाहिल्याशिवाय आपण बैठकीला जाणार नव्हतो म्हणूनच आज तुमची भेट घेण्याचा योग आला. प्रश्न काहीही असो तो मार्गी लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसत नाही. ज्या नितीन गडकरी यांनी चौपदरीकरण पुढे आणले त्यांचेही मत कुठल्याही भागाचे अस्तित्व ठेवून मगच रुंदीकरण केले पाहिजे असे आहे. संगमेश्वर हि भूमी ऐतिहासिक वारसा लाभलेली आहे. येथील अस्तित्व पुसून चौपदरीकरण केले जाणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली. रुंदीकरण प्लॅन हा सरकार बनवत नाही तर तो ठेकेदार बनवतो मग तो केंद्रात मंजुरीला जातो त्यानंतर पुढील कार्यवाही होते. आज येथील स्थिती पाहिल्यावर आपण हे अन्यायकारक वाढीव भूसंपादन रद्द करुनच घेऊ असे आश्वासन त्यांनी व्यापाऱयांना दिले.
काहीही झाले तरी संगमेश्वरला वाढीव भूसंपादन होवु देणार नाही. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून आपण हे स्वतः करून घेऊ. आणि चौपदरीकरणामूळे संगमेश्वरचे होणारे विद्रूपीकरण थांबवु असे आश्वासन प्रमोद जठार यांनी दिले.