मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे जनतेला आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
कोरोनाचा गोव्यातील संसर्ग आता कमी होत असला तरी गोमंतकीय जनतेने आणि प्रामुख्याने पर्यटकांनी कोरोनाचे सर्व नियम व अटी पाळावेत. मार्गदर्शक तत्वाचा अवलंब करावा. कोरोनाचा उद्रेक कोव्हाही होऊ शकतो म्हणून सर्वांनीच काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
गोव्यातील सर्व व्यवहार आता सुरू झाले आहेत. सर्व हॉटेल्सनीही पर्यटकांना सर्व नियम पाळावेत यासाठी आग्रह करावा. कोरोना हा रोग नाही तसेच त्याची साथ नवीन आहे. तो कमी झाला म्हणून कोणी धोका पत्करू नये. ताप आल्यास किंवा त्याची लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य केंद्रात किंवा सरकारी हॉस्पिटलात जाऊन कोरोना तपासणी करून घ्यावी. त्यासाठी हयगय करू नये. मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या सर्वांचे पालन करावे. ताप आला असेल तर घरी राहून गोळय़ा सेवन करून राहू नये. कोरोना चाचण सर्व आरोग्य केंद्रे व सरकारी हॉस्पिटलात उपलब्ध आहे. ती बंद करण्यात आलेली नाही. तसेच कोविड सेंटरही चालू आहेत, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
कुटुंबात जर कोणला ताप येत असेल तर इतरांना देखील धोका संभवतो. म्हणून कुटुंबातील सर्वांनी कोरोना चाचणी करावी. उगाचच घरी राहू नये. कोरोनाचे संक्रमण कमी झाले म्हणून उगाच फिरू नये. गोव्यात येणाऱया पर्यटकांनी देखील काळजी घ्यावी आणि सर्व मार्गदर्शक तत्वाचे काटेकोरपणे पालन करावे, असे त्यांनी नमूद केले.