प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचा कारभार सांभाळणारे उपमुख्य कार्यकारीपदी कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी भालेराव यांची नियुक्ती झालेली होती. मात्र दिड महिना उलटूनही ते हजर न झाल्याने या पदाचा कार्यभार ‘इकडून-तिकडून’ सुरू आहे. आता तर हा पदभार गुहागरचे गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांच्याकडे देण्याचा प्रशासनस्तरावरून निर्णय झाला आहे.
जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाकडून जिल्हय़ातील ग्रामविकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळेच ग्रामपंचायतींच्या कारभारालाही चालना मिळत असते. अशा या विभागाचे प्रमुख असलेल्या यापूर्वीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांची कोल्हापूर येथे बदली झाली. त्यांच्या जागी कोल्हापूर येथील अधिकारी भालेराव यांची बदलीने नियुक्ती झाली. पण दीड महिना उलटला तरी अजूनही या पदाचा कार्यभार घेण्याची प्रतिक्षा लागून राहिलेली आहे. त्याबाबतचा अहवालही जि. प. प्रशासनाने आयुक्त कार्यालयात सादर केलेला आहे.
जिह्यात असलेल्या 845 ग्रामपंचायती च्या प्रशासकीय कारभाराची सूत्रे हाताळण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अर्चना वाघमळे यांच्याकडे या पदाचा पदभार सोपवण्यात आला होता. पण वाघमळे यांच्याकडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच सामान्य प्रशासन उपमुख्यकार्यकारी अधिकारी असेही पदभार आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाचा भार सांभळण्याचे आव्हान आहे. त्यामुळे ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी पदाचा प्रभारी कार्यभार गुहागरचे गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांच्याकडे सोमवारपासून सोपवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत विभाग प्रमुखाची जबाबदारी ‘इकडून-तिकडून’ होताना दिसून येत आहे.