एपीएमसी मार्केटमध्ये 900 ते 1200 रुपये प्रतिक्विंटल दर : 10 हजार पोती आवक
वार्ताहर / किणये
बेळगावची रताळी रुचकर व स्वादीष्ट असतात. रताळय़ांचा उपयोग उपवासासाठी मोठय़ा प्रमाणात केला जातो. नवरात्रोत्सवानिमित्त बेळगावच्या रताळय़ाला मागणी वाढली आहे. बुधवारी एपीएमसी मार्केटमध्ये रताळय़ाची सुमारे 9 ते 10 हजार पोती इतकी आवक आली होती. तर रताळय़ाला प्रतिक्विंटल 900 ते 1200 रुपये इतका दर होता, अशी माहिती बेळगुंदीचे अडत व्यापारी अशोक गावडा यांनी दिली आहे.
लाल मातीतील रताळय़ाला मागणी वाढू लागली आहे. ही शेतकऱयांसाठी चांगली बाब आहे. मात्र, सध्या परतीचा पाऊस सुरू असल्यामुळे रताळी काढणी खोळंबली असल्याचे काही शेतकऱयांनी सांगितले आहे. त्यामुळे मागणी असूनही रताळी काढता येत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले
आहेत.
दसऱयाचा हंगाम साधण्यासाठी तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक शेतकऱयांनी रताळी काढण्याचे ठरविले होते. पण परतीचा पाऊस सुरू असल्यामुळे अनेकांचे नियोजन फोल ठरले आहे. काही शिवारातील रताळी पीक काढणीसाठी आलेले आहे. पण पावसाअभावी त्याची काढणी थांबली असल्याने शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
मंगळवारीही तालुक्यात परतीचा पाऊस सुरू होता, अशा पावसातच काही शेतकऱयांनी रताळी काढणी केली व ती विक्रीसाठी एपीएमसी मार्केटमध्ये नेण्यात आली.
बुधवारी बाजारात सुमारे 9 ते दहा हजार पोती इतकी आवक दाखल झाली होती. त्याला समाधानकारक दर मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव एपीएमसी मार्केटमधून महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, पंजाब, युपी आदी ठिकाणी रताळी विक्रीसाठी पाठविण्यात येत
आहेत.
पाच-सहा दिवसांपूर्वी याच रताळी पिकाला सुमारे 1400 ते 1500 रुपये प्रति क्विंटल असा दर होता. शनिवारच्या बाजारात पुन्हा रताळय़ाची आवक होणार आहे. मात्र, पावसाने उघडीप दिल्यास रताळी काढणीला जोर येणार आहे.