राज्यमंत्री विश्वजीत कदम
राष्ट्रवादीकडून जिल्ह्यात झालेल्या पक्षप्रवेशाबाबत व्यक्त केली नाराजी
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीने आपली वैचारिक लढाई कोणाबरोबर आहे हे समजून घ्यावे आणि त्यानंतरच त्यांनी पक्षप्रवेशाचे सोहळे करावेत असे आवाहन कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केले. जिल्ह्यातील काँग्रेस भरभक्कम आहे. एक दिलाने ती लढणारी आहे. त्यामुळे काँग्रेसला कोठेही धोका नाही. पण राष्ट्रवादीकडून जो पक्षप्रवेश सोहळा झाला आहे. त्याबाबत त्यांनी पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्रित येवून महाविकास आघाडी निर्माण केली आहे. हे तिन्ही पक्ष सतेत्त आहेत. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी आपल्या विरोधात कोण आहे. याची जाणीव ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सांगली जिल्ह्यात तर राष्ट्रवादीने हेच प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. तसेच आपली वैचारिक लढाई कोणाबरोबर आहे हे ही जाणून त्यांनी काम केले पाहिजे. जिल्ह्यातील सामान्य जनता ही काँग्रेसच्या पाठीशी आहे. सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते एकदिलाने आणि एक विचाराने काम करत आहेत. त्यांच्या पाठीशी काँग्रेसचे नेतेही खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.