प्रतिनिधी / बेळगाव
रेल्वे प्रवासी कमी असल्यामुळे रेल्वे विभागाने प्रवासी रेल्वेमधून माल वाहतूक करण्यास सुरुवात केली आहे. नैर्त्रुत्य रेल्वे विभागात प्रथमच अशा प्रकारे वाहतूक केली जात आहे. हुबळी विभागातील वास्को द गामापासून नागपूर विभागातील कलमेश्वरपर्यंत 166 टन मालाची वाहतूक प्रवासी रेल्वेतून करण्यात आली. यामुळे रेल्वे विभागाला आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे.
प्रवासी रेल्वेतील स्लिपर कोच डब्यांचा यासाठी वापर करण्यात आला होता. प्रत्येक डब्यातून अंदाजे 10 टन माल वाहतूक करण्यात आली. यातून 6 लाख रुपयांचा महसूल रेल्वेकडे जमा झाला आहे. प्रवासी नसल्यामुळे रेल्वेने महसूल जमा करण्यासाठी हा पर्याय शोधला असून, यामुळे जलदगतीने मालवाहतूक होत असल्याचे रेल्वेचे हुबळी विभागीय अधिकारी अरविंद मालखेडे यांनी कळविले आहे.